चंद्रपूर जिल्ह्यात कलम 37 (1) (3) लागू

चंद्रपूर जिल्ह्यात कलम 37 (1) (3) लागू

चंद्रपूर, दि.9 :  चंद्रपूर जिल्हयात  सार्वजनिक शांतता आणि कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) आणि (37) (3) अन्वये दिनांक 1 एप्रिल ते दिनांक 15 एप्रिलच्या मध्यरात्री 12 वाजेपर्यंत प्रतिबंध घालण्याचे आदेश जिल्हाधिकारी तसेच जिल्हादंडाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी निर्गमित केले आहे.

            आदेशानुसार राजकीय पक्ष, कामगार संघटन आंदोलने, जातीय सामाजिक संघटनांकडून करण्यात येणारे आंदोलने, निदर्शने, मोर्चा तसेच अतिमहत्वाचे व्यक्तीचे दौरा कार्यक्रम, विविध सण, सध्या देशात व राज्यातील लोकसभा सार्वत्रिक निवडणूक तसेच चालू घडोमाडी संबंधाने व जिल्हयात होणारी विविध राजकीय/सामाजिक/जातीय कार्यक्रम, आंदोलने व निदर्शने इत्यादी आंदोलने कार्यक्रमामुळे तसेच सण व उत्सव दरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या दृष्टीने चंद्रपूर जिल्हयात प्रतिबंध लागू करण्यात आले आहे.

            या कालावधीत कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या दृष्टीने विवक्षित कृतींना मनाई करणे व अव्यवस्थेला प्रतिबंधात्मक उपाय करणे आवश्यक आहे. तरी सदर कालावधीत शस्त्र, सोटे, तलवारी, भाले, दंडे, बंदूका, सुरे, काठया, लाठ्या किंवा शारीरिक इजा करण्यासाठी वापरता येईल, अशी इतर कोणतीही वस्तू बरोबर नेणे. कोणताही दाहक पदार्थ किंवा स्फोटक पदार्थ बरोबर नेणे, दगड किंवा इतर क्षेपणास्त्रे किंवा क्षेपणास्त्र सोडावयाची किंवा फेकावयाची उपकरणे किंवा साधने बाळगणे, जमा करणे किंवा तयार करणे.व्यक्तीच्या किंवा प्रेताच्या किंवा आकृत्या किंवा त्यांच्या प्रतिमा यांचे प्रदर्शन करणे. जाहीरपणे घोषणा करणे, गाणी म्हणने, वाद्‌ये वाजविणे. ज्यामुळे सभ्यता अगर नितीमत्ता यास धक्का पोहोचेल अशी किंवा राज्याची सुरक्षितता धोक्यात येईल किंवा ज्यामध्ये उलथवून टाकण्याची प्रवृत्ती दिसून येत असेल अशी आवेशपूर्ण भाषणे करणे, हावभाव करणे, अगर सौग आणणे आणि अशी चित्रे, चिन्हे, फलक किंवा इतर कोणताही जिन्नस किंवा वस्तू तयार करणे त्याचे प्रदर्शन करणे किंवा त्याचा जनतेत प्रसार करणे इत्यादीस प्रतिबंध करण्यात येत आहे.

            तहसिलदार तथा तालुका दंडाधिकारी अथवा संबंधित पोलिस स्टेशन अधिकारी यांचे पूर्वपरवानगी शिवाय कोणीही सभा, मोर्चा, उत्सव व मिरवणूक काढू नये, पाच किंवा त्यापेक्षा जास्त इसम सार्वजनिक जागेत, सार्वजनिक रस्त्यावर किंवा सार्वजनिक चावडीवर जमा होणार नाहीत किंवा कोणतेही कार्यक्रम आयोजित करणार नाही, याची नोंद घ्यावी. सदर आदेश 01.04.2024 चे 00.01 वा. ते दिनांक 15.04.2024 चे 24.00 वाजेपर्यंत संपूर्ण चंद्रपुर जिल्ह्याकरीता लागू राहील, असे जिल्हाधिकारी तसेच जिल्हादंडाधिकारी विनय गौडा जी.सी.यांनी निर्गमित केलेल्या आदेशात नमुद आहे.