शिक्षणासोबतच संस्कारी विद्यार्थी घडविण्यासाठी प्रयत्न करावे

शिक्षणासोबतच संस्कारी विद्यार्थी घडविण्यासाठी प्रयत्न करावे

Ø पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे आवाहन

Ø ‘मेरी माटीमेरा देश’ जिल्हास्तरीय सांस्कृतिक कार्यक्रमाचे बक्षीस वितरण

चंद्रपूर, दि. 25 : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात देशाचे पंतप्रधान नरेंद मोदी यांनी दिलेला ‘मेरी माटी, मेरा देश’ अंतर्गत ‘मिट्टी को नमन… विरो को वंदन’ हा केवळ एक कार्यक्रम नाही तर संस्कृतीचे रक्षण करून देशाची प्रगती करण्याचा संकल्प आहे. शिक्षण हे केवळ पोटभरू नसावे. तर राष्ट्रसंतांच्या शिकवणीप्रमाणे ‘माणूस द्या मज माणूस द्या’ या कृतीनुसार शिक्षणासून संस्कारी विद्यार्थी घडविण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे, असे आवाहन राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य, मत्स्यव्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

प्रियदर्शनी इंदिरा गांधी सभागृहात जिल्हा परिषदेद्वारे आयोजित ‘मेरी माटी मेरा देश’ या जिल्हास्तरीय सांस्कृतिक कार्यक्रमाच्या बक्षीस वितरण समारंभात ते बोलत होते. यावेळी मंचावर जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी, मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, जिल्हा पोलिस अधिक्षक रविंद्रसिंह परदेशी, शिक्षणाधिकारी (प्राथ.) राजकुमार हिवारे, कल्पना चव्हाण (माध्य.), उपशिक्षणाधिकारी अनिता ठाकरे, विशाल देशमुख उपस्थित होते.

आपला जिल्हा हा सर्वाधिक वाघांचा जिल्हा आहे, त्यामुळे प्रत्येक कामात वाघासारखा पराक्रम दिसला पाहिजे, असे सांगून पालकमंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले, जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीवर आधारीत काढलेले छायाचित्र, व त्याचे प्रदर्शन अप्रतिम आहे. यावेळी विद्यार्थ्यांच्या मनात एकच भाव आहे, आणि ते म्हणजे देशाविषयी प्रेम. त्यामुळे या प्रेमाला संस्काराचे खतपाणी देणे, ही आपली जबाबदारी आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानात अधिकारासोबतच कर्तव्य, जबाबदारी आणि दायित्वसुध्दा सांगितले आहे. त्यामुळे स्वत:मध्ये बदल करण्याची आवश्यकता आहे. स्वत:ला आरशात बघितले तर बदल घडविणारा हा स्वत:मध्येच दिसेल, असे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.

यावेळी मार्गदर्शन करतांना जिल्हाधिकारी विनय गौडा म्हणाले, जिल्ह्यात मेरी माटी मेरा देश हा कौतुकास्पद कार्यक्रम सर्व ग्रामपंचायत आणि नगर पंचायतीमध्ये तसेच महानगरात मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. प्रत्येकाच्या योगदानातूनच हा देश मोठा होईल. विद्यार्थी हे देश निर्माणामध्ये मोठी भुमिका निभावू शकतात. आजचे विद्यार्थी हेच देशाचे भविष्य आहे, असे ते म्हणाले. तर पोलिस अधिक्षक श्री. परदेशी म्हणाले, चित्रकला, नृत्य आदी स्पर्धेतून विद्यार्थ्यांचे कलागुण दिसले. जिल्हा परिषदेने या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रेरणादायी हिरे दिले आहेत, असे त्यांनी सांगितले.

प्रास्ताविकात मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन म्हणाले, जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या सुचनेनुसार 16 ते 20 ऑक्टोबर या कालावधीत गावस्तरावर तसेच तालुका स्तरावर विविध स्पर्धा घेण्यात आल्या. आज जिल्हास्तरीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. राष्ट्रनिर्माण प्रक्रियेत विद्यार्थ्यांचा सहभाग वाढावा, विद्यार्थ्यांमधील कलागुणांना वाव मिळावा तसेच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा, या उद्देशाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, असे ते म्हणाले. तसेच जिल्हा परिषदेमार्फत राबविण्यात येणा-या विविध अभिनव उपक्रमांची त्यांनी यावेळी माहिती दिली.

छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास ब्रेललिपीमध्ये : छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे हे 350 वे वर्ष आहे. शिवाजी महाराज हे विरता, पराक्रमाचे प्रतिक आहेत. त्यामुळे त्यांचा इतिहास डोळे नसलेल्या अंध नागरिकांनासुध्दा वाचता यावा, यासाठी ब्रेललिपीमध्ये करण्याचे नियोजन करण्यात येत आहे.

सिंगापूरच्या कॉन्सुलेट जनरलकडून चंद्रपुरातील विकासकामांचे कौतुक : गत आठवड्यात सिंगापूरचे कॉन्सुलेट जनरल यांनी चंद्रपूर येथे भेट दिली. या भेटीत त्यांनी येथील सैनिक शाळा, बॉटनिकल गार्डन, वनअकादमीची पाहणी केली. सिंगापूरला परत गेल्यावर त्यांनी तेथून लेखी पत्र लिहून चंद्रपुरातील विकास कामांचे कौतुक केले आहे.

जिल्ह्यात वैमानिक होण्याची संधी : चंद्रपूर जिल्ह्यात एस.एन.डी.टी. विद्यापीठाचे उपकेंद्र तसेच गोंडवाना विद्यापीठाचे उपकेंद्र स्थापन करण्यात येत आहे. डॉ. शामाप्रसाद मुखर्जी अभ्यासिकेच्या माध्यमातून अनेक विद्यार्थी घडत आहे. आता तर चंद्रपूर येथे तयार होणा-या फ्लाईंग क्लबच्या माध्यमातून केवळ दोन ते अडीच लाखांत जिल्ह्यातील तरुण – तरुणींना वैमानिक होण्याची संधी प्राप्त होणार आहे. यापूर्वी मिशन शौर्य अंतर्गत जिल्ह्यातील पाच आदिवासी विद्यार्थ्यांनी एव्हरेस्टवर तिरंगा फडकविला आहे.

ऑलंपिकमध्ये सहभागी होण्यासाठी प्रयत्न करा : जिल्ह्यात खेळाच्या सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. महाराष्ट्रातील तिनही स्मार्ट सिंथेटिक ट्रॅक फक्त चंद्रपूर जिल्ह्यात आहेत. सैनिक स्कूल येथील फुटबॉलचे मैदान हे जागतिक दर्जाचे आहे. मूल, बल्लारपूर, पोंभुर्णा, चंद्रपूर येथे अत्याधुनिक स्टेडीयमची उभारणी करण्यात आली आहे. चंद्रपूरात शहीद बाबुराव शेडमाके यांच्या नावाचे स्टेडीयम साकारण्यात येणार आहे. सन 2036 मध्ये ऑलंपिक स्पर्धा भारतात घेण्याचे नियोजन आहे. जिल्हा प्रशासन तसेच जिल्हा परिषदेने क्रीडा क्षेत्राकडे विशेष लक्ष देऊन उत्कृष्ट खेळाडू घडवावेत. ऑलंपिकमध्ये जिल्ह्याचा सहभाग वाढविण्यासाठी प्रयत्न करा, असे आवाहन पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

विजेत्यांचा सत्कार : तत्पुर्वी विद्यार्थ्यांनी रेखाटलेल्या चित्रकला प्रदर्शनीचे पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी विविध स्पर्धेतील विजेत्यांना गौरविण्यात आले. यात देशभक्तीपर समूह नृत्य (इयत्ता 6 ते 8) स्पर्धेतील वरोरा येथील कर्मवीर विद्यालय, जि.प.उच्च प्राथमिक शाळा, आंबेझरी, नागभीड येथील अनुसयाबाई पोषेट्टीवार विद्यालय, इयत्ता 9 ते 12 वी गटात जि.प. हायस्कूल पाथरी, आयडीयल इंग्लीश स्कूल बल्लारपूर, महात्मा गांधी विद्यालय गडचांदूर यांचा समावेश होता. तर देशभक्तीपर वैयक्तिक नृत्य स्पर्धेतील आनंदी रामटेके, सुमित राऊत चेतना मोहितकर, चित्रकला स्पर्धेतील समय पारखी, केतकी किनेकर, आर्यन सातपुते, संस्कार जिडगीलवार, आदित्य मेश्राम, दिव्यांशी गुडरू, वक्तृत्व स्पर्धेतील वैष्णवी बोढे, सनिया पाल, योगेश्वरी बामणे, नंदिनी वालदे, प्रणाली नागापुरे, निबंध स्पर्धेतील श्रध्दा गद्देवार, चतुर्थी वंजारी, अक्षरा अहिरकर, श्रध्दा जुनघरे, जानवी वाढई, सलोनी डोहाने, रांगोळी स्पर्धेतील अक्षरा निमसरकार, चैताली पाठक, केतकी किनेकर, कामेश्वरी गुंडेजवार, कुमूद कुर्जेकर, चांदणी खोबरे यांचा समावेश होता.