पंतप्रधानांच्या हस्ते गडचिरोली जिल्ह्यातील 12 ग्रामीण कौशल्य विकास केंद्राचे ऑनलाईन उद्घाटन

पंतप्रधानांच्या हस्ते जिल्ह्यातील 12 ग्रामीण कौशल्य
विकास केंद्राचे ऑनलाईन उद्घाटन
गडचिरोली, दि.19: आजच्या तरुण – तरुणींना शिक्षणासोबतच कौशल्याचे प्रशिक्षण देऊन त्यांना रोजगाराभिमुख करण्यासाठी कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्यावतीने प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात आली आहे. या अंतर्गत गडचिरोली जिल्ह्यातील 12 केंद्राचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन उद्घाटन करण्यात आले. यात विसोरा, असरअली, गेदा, मुरुमगाव, पोर्ला, आष्टी, कढोली, वैरागड, सुंदरनगर, कोटगुल, आरेवाडा आणि आलापल्ली येथील ग्रामीण कौशल्य विकास केंद्रांचा समावेश आहे.
वैरागड येथे पार पडलेल्या कार्यक्रमाला खासदार अशोक नेते उपस्थित होते. तर पोर्ला येथील कार्यक्रमाला जिल्हाधिकारी संजय मिना, मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. तसेच वैरागड येथे जिल्हा कौशल्य विकास केंद्राचे सहाय्यक आयुक्त योगेंद्र शेंडे, आरमोरीचे तहसीलदार श्री. माने यांच्यासह वैरागडचे सरपंच, उपसरपंच आणि गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राज्यातील 511 प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्राचे ऑनलाईन उद्घाटन करण्यात आले. मार्गदर्शन करतांना पंतप्रधान म्हणाले, जगात भारतातील कार्यक्षम आणि प्रशिक्षित युवकांची मागणी वाढली आहे. बांधकाम, आरोग्य, पर्यटन, शिक्षण, वाहतूक व संदर्भीय सेवा या क्षेत्रात विशेष मागणी आहे. प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्राच्या माध्यमातून ग्रामीण भागातील तरुण तरूणी रोजगाराभिमुख प्रशिक्षित होतील. महाराष्ट्रात बांधकाम आणि मनोरंजनाच्या क्षेत्रात मोठे काम असल्यामुळे भविष्यातही अनेक केंद्र स्थापन होणार आहेत. महाराष्ट्र सरकारने लघु प्रशिक्षणाकडेसुध्दा लक्ष केंद्रीत करावे. त्यासाठी प्रशिक्षणाचे ऑनलाईन सत्र आयोजित करावे. प्रशिक्षित लोकांना उद्योगांचे प्रथम प्राधान्य असते. भारतात केंद्र सरकारने कौशल्य विकास मंत्रालयाची स्थापना करून वेगळे बजेट त्यासाठी दिले आहे. कौशल्य विकासाचा सर्वाधिक लाभ गरीब कुटुंबांना होतो. केंद्र सरकारने पी.एम. विश्वकर्मा योजना सुरू केली असून यासाठी 13 हजार कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे. राज्यातील 511 ग्रामीण कौशल्य विकास केंद्रातून ही योजना पुढे जाणार असल्याचेही पंतप्रधान म्हणाले.