शेतकऱ्यांनो पुरेसा पाऊस पडल्यानंतरच करा पेरणी

शेतकऱ्यांनो पुरेसा पाऊस पडल्यानंतरच करा पेरणी

Ø मुख्य सचिवांकडुन कृषी निविष्ठा व गुणनियंत्रक विषयक आढावा

 

चंद्रपूर, दि. 21 : यावर्षी अल निनोच्या प्रभावामुळे पावसाळा उशिरा सुरू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी माहे जुनअखेर पेरणीची घाई न करता पेरणी योग्य म्हणजे 100 मिमी पाऊस किंवा जमिनीमध्ये 6 इंच ओल असल्यानंतरच पेरणी करावी. जेणेकरुन, केलेली पेरणी व्यर्थ जाणार नाही व अपुऱ्या ओलीमध्ये पेरणी केल्यामुळे उगवण न होणे व दुबार पेरणी करावी लागून बियाण्याच्या खरेदीच्या खर्चात वाढ होणे ही परिस्थिती शेतकऱ्यांवर येणार नाही, असे निर्देश राज्याचे मुख्य सचिवांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयातील वीस कलमी सभागृहात दृकश्राव्य पद्धतीने कृषी निविष्ठा व गुणनियंत्रक विषयक आढावा राज्याचे मुख्य सचिवांनी घेतला. यावेळी ते बोलत होते.

 

बैठकीला जिल्हाधिकारी विनय गौडा, मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी शंकर तोटावार व कृषी विकास अधिकारी लक्ष्मीनारायण दोडके आदींची उपस्थिती होती.

 

जुनच्या पहिल्या तीन आठवड्यामध्ये सरासरीच्या केवळ 3 टक्के पाऊस पडला आहे. त्यामुळे पेरणी केल्यास दुबार पेरणी करण्याची वेळ शेतकऱ्यांवर येऊ शकते. याअनुषंगाने, राज्याचे मुख्य सचिवांनी यासंदर्भात आढावा बैठक घेतली. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये जुन महिन्यात सरासरीच्या 3 टक्के पाउस झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी सद्यस्थितीत पेरणी न करता पुरेसा पाउस झाल्यानंतरच पेरणी करावी असे आवाहन करण्याचे निर्देश बैठकीत देण्यात आले.