अनाधिकृत बियाणे खरेदी न करण्याचे कृषी विभागाचे आवाहन

अनाधिकृत बियाणे खरेदी न करण्याचे कृषी विभागाचे आवाहन

 

चंद्रपूर, दि. 21 : जिल्ह्यामध्ये कापूस हे प्रमुख पीक आहे. खरीप हंगाममधे सुमारे 1.75 लाख हेक्टर क्षेत्रावर कापसाची लागवड केली जाते. शेतकऱ्यांनी या लागवडीसाठी प्रामुख्याने शासनमान्य बी.टी. बियाणेच वापरावे. जिल्ह्यामध्ये सध्या अवैध एच.टी.बी.टी बियाणे छुप्या मार्गाने अवैधरीत्या पुरवठा होण्याची शक्यता असून अशा बियाण्याला शासनाची मान्यता नाही. अशाप्रकारचे बियाणे बाळगणे, विक्री करणे हा कायद्याने गुन्हा असून असे बियाणे आढळून आल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येणार आहे.

 

एच.टी.बी.टी बियाण्याची लागवड केल्यामुळे जमिनीच्या सुपीकतेवर विपरीत परिणाम होऊन जमिनीचा पोत खराब होतो व कालांतराने जमीन नापीक होते. तसेच त्याचा आरोग्यावर देखील विपरीत परिणाम होतो. त्यामुळे शेतकऱ्यानी अधिकृत बी.टी. बियाण्यांचीच लागवड करावी, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी शंकरराव तोटावार यांनी केले आहे.