पशुसंवर्धन विभागाकडून दोन हजाराहून अधिक लाभार्थ्यांना दिला विविध योजनांचा लाभ

शासन आपल्या दारी अभियानांतर्गत पशुसंवर्धन विभागाकडून

दोन हजाराहून अधिक लाभार्थ्यांना दिला विविध योजनांचा लाभ

 

भंडारा, दि. 6 : लोकाभिमुख प्रशासनाच्या दृष्टीने पाऊल उचलत शासन आपल्या दारी अभियानातून पशुसंवर्धन विभागाकडून राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांचा लाभ 2 हजार 200 पेक्षा अधिक लाभार्थ्यांना प्राप्त झाला आहे.

पशुसंवर्धन विभागाकडून विविध योजनेच्या माध्यमातून पशुपालकांना थेट लाभ देण्यात येत आहे. सर्वसाधारण प्रवर्गासाठी 50 टक्के अनुदानावर एकात्मिक विकास कुक्कुट कार्यक्रमांतर्गत एक दिवसीय पिल्लांचे गट वाटप या योजनेअंतर्गत 125 निवड झालेल्या लाभार्थ्यांना एक दिवसीय पिल्ले व खाद्य वाटप करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

वैरण विकास कार्यक्रमांतर्गत सर्वसाधारण प्रवर्गात 1 हजार 136 लाभार्थ्यांची निवड झालेली असून लाभार्थ्यांना चारा पिकांचे बियाणे वाटप करण्यात आले. विशेष घटक योजनेंतर्गत अनुसूचित जातीच्या 172 लाभार्थ्यांना 2 दुधाळ जनावरांचे गट वाटपाची प्रक्रिया सुरू आहे. आदिवासी क्षेत्राबाहेरील उपयोजनेंतर्गत 2 दुधाळ जनावरांचे गट व शेळी गट वाटप 57 लाभार्थ्यांची निवड झाली असून लाभ देण्याची प्रक्रिया सुरू आहे.

मानव विकास कार्यक्रम अंतर्गत 120 महिला बचत गटांची निवड झालेली असून 1 हजार 100 महिलांना शेळी गटाचा लाभ मिळालेला आहे. राज्यस्तरीय नावीण्यपूर्ण योजनेंतर्गत तसेच मराठवाडा योजना या अंतर्गत 150 लाभार्थ्यांना थेट लाभ देण्यात प्राप्त झालेला आहे.

शासन आपल्यादारी अभियानांतर्गत पशुसंवर्धन विभागाकडून संपूर्ण जिल्ह्यात 47 शिबिरे घेण्यात आली असून 2 हजार 200 लाभार्थ्यांना लाभ देण्यात आलेला आहे. जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. सुबोध नंदागवळी व जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. योसुदेव वंजारी यांनी योग्य नियोजन करुन पशुसंवर्धन विभागामार्फत शिबिरे आयोजित करुन केंद्र व राज्य पुरस्कृत योजनांचा लाभ दिला आहे