पर्यावरणपूरक जीवन पध्दती अभियानांतर्गत कार्यशाळा संपन्न

पर्यावरणपूरक जीवन पध्दती अभियानांतर्गत कार्यशाळा संपन्न

 

चंद्रपूर, दि. 23: संयुक्त राष्ट्र हवामान बदल परिषदेमध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी लाईफस्टाईल फॉर द एन्व्हायरमेंट (युएफई) अभियानाची घोषणा केली. हवामान बदलांच्या दुष्परिणामांची तीव्रता कमी करण्यासाठी प्रत्येकाने आपले योगदान द्यावे, हे या अभियानाचे ध्येय आहे. या मोहिमेअंतर्गत दि. 22 ते 28 मे या कालावधीत जिल्हा तसेच तालुका पातळीवर यासंबंधी प्रशिक्षण कार्यशाळा, किसान गोष्टी आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. या सप्ताहाच्या अनुषंगाने 22 मे रोजी आत्मा सभागृह, चंद्रपूर येथे जिल्हास्तरीय कार्यशाळा पार पडली.

 

सदर कार्यशाळेमध्ये हवामान अनुकूल कृषी तंत्रज्ञान वापरातील शेतकऱ्यांपुढील आव्हाने, हवामानातील बदलास प्रतिकारक्षम पीक काढणीपूर्व व काढणी पश्चात तंत्रज्ञानाचा अवलंब, जसे भरड धान्याच्या व कडधान्याच्या पेरा क्षेत्रात वाढ तसेच अन्य पिकांच्या विशिष्ट वाणांचा वापर, हवामान बदलावर मात करून उत्पादकता वाढवता येईल असे तंत्रज्ञान, हवामान बदलावर मात करण्यासाठी मृद संधारणाच्या मशागत पद्धती, पीक संरक्षण तंत्रज्ञानासह शाश्वत कृषी उत्पादन पद्धती, पीक वैविधता आणि पीक पद्धतीत बदल करून भविष्यातील शाश्वत अन्न सुरक्षेसाठी वापरावयाचे उपरोक्त बाबी साध्य करण्यासाठी ऊर्जा व पाणी बचत आणि पौष्टिक तृणधान्याचा वापर या घटकावर भर देणे आदी बाबींचा प्रामुख्याने समावेश करण्यात येत असल्याचे आत्माच्या प्रकल्प संचालक, प्रिती हिरुळकर, यांनी जिल्हास्तरीय कार्यशाळेत मत व्यक्त केले.

 

कार्यशाळेत कृषी उपसंचालक चंद्रकांत ठाकरे, राजुऱ्याचे उपविभागीय कृषी अधिकारी मंगेश पवार, चिमुरचे तालुका कृषी अधिकारी ज्ञानदेव तिखे, पोंभूर्णाचे तालुका कृषी अधिकारी चंद्रकांत निमोड तसेच गणेश मादेवार, मंडळ कृषी अधिकारी, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक, सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक व शेतकरी उपस्थित होते.