16 ऑगस्ट रोजी राज्यस्तरीय सोयाबीन परिषद Ø शेतकरी बांधवांना लाभ घेण्याचे कृषी विभागाचे आवाहन

16 ऑगस्ट रोजी राज्यस्तरीय सोयाबीन परिषद

Ø शेतकरी बांधवांना लाभ घेण्याचे कृषी विभागाचे आवाहन

चंद्रपूर दि. 13 ऑगस्ट : राज्यात खरीप हंगामात सोयाबीन हे प्रमुख पीक असून सर्वात जास्त शेतकरी सोयाबीनचे पीक घेतात. राज्यात सर्वसाधारणपणे 44 लाख हेक्टर क्षेत्रावर सोयाबीन पिकाची पेरणी केली जाते.   

सोयाबीन पिकांचे उत्पन्न व उत्पादकता वाढविण्याबरोबरच मूल्य साखळी विकासासाठी व्यापक प्रयत्न व चर्चा होण्याच्या दृष्टीने राज्याचे कृषी मंत्री दादाजी भुसे  यांच्या संकल्पनेतून व त्यांच्या उपस्थितीत कृषी विभाग व वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी यांच्या संयुक्त विद्यमानाने कृषी महाविद्यालय, लातूर  येथे दि. 16 ऑगस्ट 2021 रोजी सकाळी 9.30 वाजता राज्यस्तरीय सोयाबीन परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. 

सदर परिषदेमध्ये सोयाबीन पिकासाठी विकसीत अद्ययावत उत्पादन तंत्रज्ञान, सोयाबीन पिकाशी निगडीत यांत्रिकीकरण, सोयाबीन प्रक्रियामधील संधी व आव्हाने, विपणन व वायदे बाजार इ. बाबीवर अधिक उत्पादन घेणारे शेतकरी, उद्योजक, सोयाबीन व्यवसायातील तज्ञ, कृषि विद्यापीठाचे शास्त्रज्ञ, शेतकरी उत्पादक कंपन्याचे प्रतिनिधी सहभागी होणार आहेत.

  सदर परिषेदेचे उदघाटन राज्याचे कृषी मंत्री दादाजी भुसे करणार असून वैद्यकीय शिक्षण, सांस्कृतिक कार्य तथा लातूरचे पालकमंत्री अमित देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली परिषद संपन्न होणार आहे. सदर परिषद कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम, राज्यमंत्री संजय बनसोडे, सचिव (कृषि) एकनाथ डवले, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू अशोक ढवण तसेच आयुक्त (कृषि) धीरजकुमार यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडणार आहे.  

सोयाबीन परिषदेमध्ये तज्ञ मान्यवरांच्या मार्गदर्शनाखाली शेतकरी, शास्त्रज्ञ, वायदेबाजार विश्लेषक  व उद्योजक यांच्यामध्ये विविध विषयांवर थेट परिसंवाद होणार असून या परिषदेमुळे सोयाबीन पिकाबाबत  महाराष्ट्र शासनाचे भविष्यातील धोरण ठरविणे सुकर होणार आहे.

या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण कृषी विभागाचे यूट्यूब चैनल www.youtube.com/C/ AgricultureDepartmentGoM वरून होणार असून जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन कृषि संचालक (विस्तार व प्रशिक्षण) विकास पाटील यांनी केले आहे.