नागरी, शहरी पूर आपत्तीप्रसंगी पूर्वतयारी व प्रतिबंधात्मक उपाययोजने संदर्भात मार्गदर्शक सूचना

नागरी, शहरी पूर आपत्तीप्रसंगी पूर्वतयारी व प्रतिबंधात्मक उपाययोजने संदर्भात मार्गदर्शक सूचना

चंद्रपूर, दि. 7 ऑगस्ट : राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने नागरी पूर आपत्ती प्रसंगी पूर्वतयारी व प्रतिबंधक उपाययोजनांबाबत सूचना दिल्या आहेत. प्रत्येक राज्यांमध्ये उच्चतम पूर पातळी ठरविणे. प्रत्येक शहरामध्ये तांत्रिकदृष्ट्या सक्षम समन्वय अधिकाऱ्यांसह (नोडल ऑफिसर), नागरी पूर व्यवस्थापन यंत्रणा स्थापन करणे. प्रत्येक शहराने किनारवर्ती शहरे, मुख्य, मोठ्या नदी किनाऱ्यावरील शहरे, धरणा जवळील, जलाशयाजवळील शहरे, अंतर्गत शहरे, डोंगराळ प्रदेशातील शहरे यांनी परिस्थिती विचारात घेऊन नागरी पूर व्यवस्थापन आणि उपक्षमण यासाठी प्रमाणित कार्यपद्धती लागू करावी.

नागरी पूर व्यस्थापनासाठी सर्व भागीदारांची क्षमता बांधणी व उत्तम समन्वयासाठी मान्सूनपूर्व कार्यशाळेचे आयोजन करणे. स्थानिक कल्याणकारी प्राधिकारी किंवा अन्य समाज गटांची प्रभागनिहाय यादी तयार ठेवावी व संपूर्ण शहरासाठी त्याचे सहाय्य घेणे. मान्सूनचे आगमन होण्याच्या बऱ्याच कालावधीपूर्वी शहरातील जलाशयांच्या पाण्याचे शुद्धीकरण तसेच गटारामधील गारळ प्रभावीपणे काढण्याची कार्यवाही पूर्ण करणे. प्रत्येक शहरातील पाण्याच्या साठ्यांच्या स्थितीचे व मालकी हक्काचे सूचीकरण व मॅपिंग करणे.

शहरातील पूर परिस्थितीजन्य भागातील पाण्याचा उपसा करण्यासाठी पंप बसविणे. विमानतळ असणाऱ्या शहराच्या समन्वय अधिकाऱ्याने पावसाच्या सद्यस्थिती व भाकिता संबंधीच्या स्थिती बरोबर चक्रीवादळ व अतिवृष्टीची माहिती भारतीय हवामान विभागाकडून घेणे आवश्यक आहे. ही माहिती मेटार्स (METARS)या संस्थेकडून दर 30 मिनिटांनी अद्ययावत करण्यात येते. जेव्हा चक्रीवादळ व अतिवृष्टीची स्थिती असते तेव्हा ही माहिती महानगरपालिकेच्या आयुक्तांना तातडीने कळविणे गरजेचे असते. जेणेकरून ते सावधानता बाळगून त्यावर प्रतिबंधक उपाययोजना करतील. जसे, पूरग्रस्त व अतिवृष्टी क्षेत्रातील शाळा बंद करणे आदी.

जलाशयातून, धरणातून पाण्याचा विसर्ग करण्याचा निर्णय जागेवर घेण्याच्या दृष्टीने प्रत्येक शहरासाठी पुरेसे अधिकार असणाऱ्या उच्चस्तरीय तज्ञ समितीची स्थापना करणे. जलाशयातून, धरणातून पाण्याचा विसर्ग केला असता शेजारील राज्यांना ती माहिती त्याच वेळी देणे.

प्रत्येक राज्य, जिल्हा प्राधिकरणाने धोका नकाशा तयार करणे गरजेचे आहे. जेणेकरून, उपलब्ध साधनांचा पुरेपूर वापर करता येईल.

पुराच्या मुख्य कारणांमध्ये अतिवृष्टी व बर्फ वितळणे याचा समावेश होतो. त्यामुळे बर्फ वितळणे, ढगफुटीमुळे उद्भवणाऱ्या परिस्थितीत धरणातून केला जाणारा पाण्याचा विसर्ग यावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे.

आपत्तीच्या परिस्थितीचा पूर्वानुमान बांधून आपत्तीमध्ये लागणाऱ्या मूलभूत बाबी म्हणजे पाणीपुरवठा, अन्नपुरवठा, वैद्यकीय सोयी, स्वच्छतेच्या सोयी इत्यादीची माहिती राज्य शासनाने संग्रहित करून ठेवणे गरजेचे आहे. जेणेकरून, आपत्तीच्या वेळी मदत पोहोचवणे सहज शक्य होईल.

आपत्ती संबंधातील माहिती त्याचवेळी मिळण्यासाठी पूर्ण नियंत्रण सॉफ्टवेअर विकसित करणे. आपत्तीमध्ये काय करावे काय करू नये याबाबतची माहिती जाहिरातीद्वारे स्थानिक भाषेत देणे. हवामानाच्या वृत्तांतासाठी प्रादेशिक भारतीय हवामान विभागाच्या संपर्कात रहावे. पुराच्या अंदाजासाठी केंद्रीय जल आयोगाच्या संपर्कात राहणे. किनारपट्टीच्या भागांमध्ये छत नसलेल्या घराच्या सुरक्षेसाठी U (यु) आकाराच्या गळाचा वापर करणे. झाडांची नियमित छाटणी योग्य प्रकारे होते की नाही तसेच जनजागृतीचे व जाहिरातीचे फलक सुस्थितीत आहेत की नाही याची खात्री करणे आवश्यक आहे.