खरीप हगांम पिक स्पर्धा-2022 Ø जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पिक स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन

खरीप हगांम पिक स्पर्धा-2022

Ø जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पिक स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन

चंद्रपूर, दि.27 जुलै : पिकांची उत्पादकता वाढविण्यासाठी विविध भागांमध्ये शेतकऱ्याकडून विविध प्रयोग करण्यात येतात व उत्पादकतेत वाढ करण्यात येते, अशा प्रयोगशील शेतकऱ्यांना मिळालेल्या उत्पादकतेबाबत प्रोत्साहन देऊन विजेत्या शेतकऱ्यांचा गौरव केल्यास, त्यांचे मनोबल वाढण्यास मदत होईल तसेच अधिक उमेदीने नवनवीन अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल. यामुळे कृषी उत्पादनामध्ये भर घालण्यासाठी शेतकऱ्यांचे योगदान मिळेल. तसेच त्यांचे मार्गदर्शन परिसरातील इतर शेतकऱ्यांना होऊन राज्याच्या एकूण उत्पादनात मोलाची भर पडेल, हा उद्देश ठेवून राज्यात कृषि विभागामार्फत पिक स्पर्धा योजना राबविण्यात येत आहे.

पीक स्पर्धेतील महत्वाच्या बाबी:

पिक स्पर्धेसाठी पिकनिहाय तालुका हा एक घटक आधारभुत धरण्यात येईल. खरीप हंगामासाठी भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी (रागी), तुर, मुग, उडीद, सोयाबीन, भुईमूग, सूर्यफूल असे एकूण 11 पिके स्पर्धेत समाविष्ट आहेत. प्रति तालुका किमान स्पर्धक संख्या ही सर्वसाधारण गटासाठी 10 व आदिवासी गटासाठी 5 राहील. पिक स्पर्धेमध्ये सहभागी लाभार्थ्यांच्या शेतावर त्या पिकाखाली किमान 10 आर. क्षेत्रावर सलग लागवड असणे आवश्यक आहे. पुरेशे अर्ज प्राप्त झाल्यानंतर संबंधित पिकाची पिक स्पर्धा संबंधित तालुका कृषी अधिकारी जाहीर करतील. तालुक्यात पिक कापणी प्रयोग घ्यावयाची किमान संख्या सर्वसाधारण गटासाठी 05 व आदिवासी गटासाठी 04 राहील.

स्पर्धेत भाग घेणाऱ्या शेतकऱ्याला एकाच वेळी एकापेक्षा जास्त पिकासाठी स्पर्धेत सहभाग घेता येईल. प्रवेश शुल्क सर्व गटासाठी पीक निहाय प्रत्येकी रक्कम रु. 300 राहील. अर्ज सादर करण्याची तारीख मूग व उडीद पीकासाठी 31 जुलै तर भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी (रागी), तूर, सोयाबीन, भुईमूग व सूर्यफूल या पीकांसाठी 31 ऑगस्ट 2022 राहील. पीक स्पर्धेत भाग घेऊ इच्छिणाऱ्या स्पर्धकांचे अर्ज विहित नमुन्यामध्ये भरून त्यासोबत ठरवून दिलेले प्रवेश शुल्क चलन, 7/12, 8-अ चा उतारा व जात प्रमाणपत्र (केवळ आदिवासी असल्यास) आदी कागदपत्रांची पूर्तता करून तालुका कृषी अधिकारी कार्यालयात सादर करावे.

पीक स्पर्धा विजेत्यांसाठी बक्षिसाचे स्वरुप:

पिक स्पर्धा विजेत्यांसाठी तालुका पातळीवर बक्षिसांचे स्वरूप सर्वसाधारण व आदिवासी गटासाठी पहिले बक्षीस रु.5 हजार, दुसरे 3 हजार, तर तिसरे बक्षीस रु. 2 हजार, जिल्हा पातळीवर पहिले बक्षीस रु. 10 हजार, दुसरे 7 हजार, तर तिसरे बक्षीस रु.5 हजार असेल. विभाग पातळीवर पहिले बक्षीस रु. 25 हजार, दुसरे 20 हजार तर तिसरे बक्षीस रु. 15 हजार असेल, राज्य पातळीवर सर्वसाधारण व आदिवासी गटासाठी पहिले बक्षीस रु. 50 हजार, दुसरे बक्षीस रु.40 हजार तर तिसरे बक्षीस रु. 30 हजार याप्रमाणे देय राहील.

पिक स्पर्धेच्या मार्गदर्शक सुचना कृषी विभागाच्या www.krishi.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. तसेच अधिक माहितीसाठी गावातील कृषी सहाय्यक,कृषी पर्यवेक्षक, तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा.

रब्बी हंगाम-2020 तसेच खरीप व रब्बी हंगाम 2021-22 मध्ये पीक स्पर्धेसाठी जिल्ह्यातील शेतक-यांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला. त्याचप्रमाणे खरीप हंगाम-2022 मध्ये देखील जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी मूग व उडीद पिकांसाठी 31 जुलै 2022 पुर्वी तर इतर खरीप पिकांसाठी दि. 31 ऑगस्ट 2022 पुर्वी अर्ज सादर करुन पिक स्पर्धेमध्ये मोठया प्रमाणात सहभागी व्हावे,असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात येत आहे.