भंडारा : ‘डेंग्यू’वर प्रतिबंधात्मक उपाय करा, कोरडा दिवस पाळा जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

‘डेंग्यू’वर प्रतिबंधात्मक उपाय करा, कोरडा दिवस पाळा

  • जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन
  • लसीकरणाचाही आढावा

भंडारा, दि.9: भंडारा शहरासह जिल्ह्यात डेंग्यू आजार वाढत आहे. प्रशासकीय यंत्रणेतर्फे सुरू असलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांना वेग द्यावा आणि नागरिकांनीही त्यांची जबाबदारी ओळखून ‘कोरडा दिवस’ पाळावा, असे आवाहन जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी केले. आज दूरदृश्य प्रणालीद्वारे प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा आढावा जिल्हाधिकारी यांनी घेतला. निवासी उपजिल्हाधिकारी शिवराज पडोळे, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. आदिती त्याडी, डॉ. माधुरी माथूरकर अधिकारी यावेळी उपस्थित होते.

            फवारणी प्राधान्याने करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी आरोग्य यंत्रणा, सर्व नगरपालिका व नगरपंचायतींना दिले. आशा वर्कर यांनी घरोघरी जाऊन जनजागृती करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. डेंग्यू आजाराबाबत प्रशासनासोबतच नागरिकांनीही दक्ष राहण्याचे आवाहन करताना,  कोविड -19 च्या विषाणू प्रतिबंधासाठी प्रभावी व परिणामकारक उपाययोजना सुरु असताना भंडारा शहरासह संपूर्ण जिल्ह्यात डेंग्यू तापाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. डेंग्यू ताप किंवा डेंगी ताप हा एक विषाणूजन्य आजार आहे. इडीस  इजिप्ती डासाच्या चावण्यामुळे तो प्रसारित होतो. हा एक तीव्र फ्ल्यूसारखा आजार आहे. हा आजार दोनप्रकारे होऊ शकतो. यामध्ये डेंग्यू ताप आणि डेंग्यू रक्तस्त्रावात्मक ताप (डीएचएफ) डेंग्यू तापाच्या रुग्णाला उपचारासाठी विलंब झाल्यास मृत्यू ओढवू शकतो. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने खबरदारी घेणे अत्यंत आवश्यक आहे.

डेंग्यू ताप लहान मुलांमध्ये सुद्धा आढळून आला आहे. या तापामध्ये डोके व डोळे दुखणे, अंग दुखणे, अशक्तपणा, अंगावर लाल रंगाचा चट्टा तसेच तीव्र स्वरुपाची अंगदुखी ही डेंग्यूची लक्षणे आहेत. या गंभीर स्वरुपाचा आजार डेंग्यू हा मादी डासाच्या चावण्याद्वारे पसरतो. या डासांना आळा घालणे या एकमेव उपायामुळे डेंग्यूचा प्रसार थांबवू शकतो. घराच्या आजूबाजूला पाणी साठू न देणे, वेळच्यावेळी  साठलेले पाणी रिकामे करणे या गोष्टी डासांना प्रतिबंध करु शकतात. पावसाचे पाणी घराच्या आवारात अथवा परिसरात कुठेही थांबणार नाही याची दक्षता  घ्यावी. तसेच यासाठी आठवड्यातून  एक दिवस ‘कोरडा दिवस’ म्हणून पाळावा, असे आवाहन त्यांनी केले आहे. घरातील व्यक्तीला ताप आल्यास व लक्षणे आढळल्यास तात्काळ जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करावे. नगरपालिका, जिल्हा परिषद, आरोग्य विभाग हे डेंगीच्या आजारावर प्रतिबंधात्मक उपाययोजना करत आहेत. जनतेने जिल्हा प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी केले आहे. या बैठकीत लसीकरणाही आढावा घेण्यात आला आहे.