चंद्रपूर : गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेंतर्गत विमा प्रस्ताव तात्काळ सादर करावेत

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेंतर्गत

विमा प्रस्ताव तात्काळ सादर करावेत

चंद्रपूर दि. 28 जुलै : नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे राज्यांमध्ये बऱ्याच ठिकाणी दरड कोसळून, पुराच्या पाण्यात वाहून किंवा अन्य अपघाताने शेतकऱ्यांच्या कुटुंबियांचा दुर्दैवी मृत्यू अथवा कायमस्वरूपी अपंगत्व आल्याच्या घटना घडलेल्या आहेत. या पार्श्वभूमीवर सदर कुटुंबियांच्या वारसदारांना आर्थिक मदत म्हणून गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत 1 ते 2 लाखांपर्यंत विमा संरक्षण उपलब्ध आहे. अपघातग्रस्तांच्या वारसदारांनी आपल्या कार्यक्षेत्रातील कृषी पर्यवेक्षक किंवा तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क करून विमा प्रस्ताव सादर करावा, असे आवाहन कृषी विभागाचे संचालक (विस्तार व प्रशिक्षण) विकास पाटील यांनी केले आहे.

विमा प्रस्तावासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे संबंधित विभागांनी प्राधान्याने उपलब्ध करून द्यावीत. जेणेकरून बाधित कुटुंबास विमा संरक्षणाचा लाभ शीघ्रतेने देता येईल. विमा प्रस्ताव तयार करण्याकरीता ऑक्झीलियम इन्शुरन्स ब्रोकिंग कंपनीच्या जिल्हा प्रतिनिधींची मदत घ्यावी. या विमा सल्लागार कंपनीचा टोल फ्री क्रमांक 1800 220 812 असा आहे. अपघात ग्रस्त शेतकरी कुटुंबियांच्या वारसदारांनी युनिव्हर्सल सोंपो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या विमा कंपनीच्या टोल फ्री क्रमांक 1800 22 4030 किंवा 1800 200 40 30 यावर पूर्व सूचनेची नोंद करावी, असे कृषी विभागामार्फत कळविण्यात आले आहे.