महाराष्ट्रातील तीन साहित्यिकांना साहित्य अकादमीचा ‘युवा साहित्य’ पुरस्कार प्रदान मराठी, संस्कृत, ऊर्दु भाषेसाठी पुरस्कार

महाराष्ट्रातील तीन साहित्यिकांना साहित्य अकादमीचा ‘युवा साहित्य’ पुरस्कार प्रदान मराठी, संस्कृत, ऊर्दु भाषेसाठी पुरस्कार

 

नवी दिल्ली, 28 : महाराष्ट्रातील तीन युवा साहित्यिकांना क्रमश: मराठी, संस्कृत आणि उर्दू भाषेसाठी साहित्य अकादमीच्या प्रतिष्ठित ‘युवा साहित्य’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

येथील कमानी सभागृहात मंगळवारी युवा साहित्यिक पुरस्कार सोहळयाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी साहित्य अकादमीचे उपाध्यक्ष माधव कौशिक आणि प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध साहित्यिक ममता कालिया उपस्थित होते. कार्यक्रमात एकूण 24 भाषेसाठी ‘युवा साहित्यिकांना वर्ष 2022 चे साहित्य अकादमी पुरस्कार प्रदान करण्यात आले. यामध्ये महाराष्ट्रातील तीन युवा साहित्यिकांचा समावेश आहे.

मराठी भाषेसाठी युवा साहित्यिक पवन नालट यांना ‘मी संदर्भ पोखरतोय’ या काव्य संग्रहासाठी ‘युवा साहित्य’ साहित्य अकादमीचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यांच्या या साहित्यकृतीत ‘मी संदर्भ पोखरतोय’ या शिर्षकातूनच बऱ्याच गोष्टी व्यक्त होत असल्याचे श्री नालट म्हणाले. मी म्हणजे सामान्य माणूस, मी चा संदर्भ समाजातील राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक,आर्थिक या सर्व घटकांमध्ये जे अनिष्ट आहे त्याला पोखरण्याचे काम हा सामान्य माणुस करू शकतो. अशा आशयाच्या कविता या काव्य संग्रहात असल्याचे श्री नालट म्हणाले.

श्री नालट हे मुळचे अमरावतीचे असून ते शिक्षक आहेत. त्यांच्या याच कविता संग्रहाला के.बी. निकुंब काव्यसंग्रह पुरस्कार, विदर्भ साहित्य संघाचा नवोदित साहित्य लेखनाचा पुरस्कार तसेच डॉ. किसनराव पाटील वाड:मय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे.

‘श्रीमतीचरित्रम्’ या संस्कृत काव्य संग्रहासाठी श्रुती कानिटकर यांना पुरस्कार

मुंबईच्या श्रुती कानिटकर यांना त्यांच्या संस्कृत भाषेतील ‘श्रीमतीचरित्रम्’ या काव्यसंग्रहासाठी ‘युवा साहित्य’ साहित्य अकादमीचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. राधा-कृष्ण प्रेम हे सर्व परिचित आहे. कृष्णाबद्दल सर्वांना माहिती आहे. मात्र, राधाबद्दल कमी लोकांना माहिती असल्याचे श्रुती यांनी सांगितले. त्या म्हणाल्या, राधा या चरित्रावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न या काव्यसंग्रहात करण्यात आलेला आहे. हे काव्य सात विभागात आहे. प्रत्येक भागाला लीला असे नाव देण्यात आलेले आहे. यात प्रेम भक्ती व्यक्त करण्यात आलेली आहे.

श्रुती कानिटकर या आयआयटी मुंबईत सहायक प्राध्यापक आहेत. त्या वेदांतमध्ये पी.एच.डी करीत आहेत. श्रुती यांनी वयाच्या 11 वर्षापासून लेखनाला सुरूवात केली. त्यांच्या श्रीमतीचरित्रम् (कविता संग्रह), सुभाषित – रत्नभांडागारम् (मराठीतील अनुवादाला) श्रीपाद सेवा मंडळ काव्य लेखन स्पर्धेमध्ये सन्मानित करण्यात आलेले आहे.

 

‘गिरयाह’ ग़ज़ल संग्रहासाठी मक़सूद आफ़ाक़ यांना युवा साहित्यचा पुरस्कार

 

‘गिरयाह’ ग़ज़ल संग्रहासाठी मक़सूद आफ़ाक़ यांना वर्ष 2022 चा ‘युवा साहित्य’ साहित्य अकादमीचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यांचा ग़ज़ल संग्रह सामाजिक संबंध, मानवीय मूल्य, श्रम आणि आधुनिक दुनियेतील भ्रम यावर आधारित आहे. हा संग्रह पारंपरिक आणि आधुनिक ग़ज़लांचे संयोजन आहे. जीवनातील चढ उतार ग़ज़लांच्या माध्यमातून व्यक्त करण्यात आलेले आहेत.

 

मुंबईचे मकसूद आफ़क़ हे शिक्षक आहेत. त्यांचे ऐतबार आणि गिरयाह हे दोन ग़ज़ल संग्रह आहेत. त्यांनी वेब सीरीज साठीही गीत लिहीले आहेत. त्यांना महाराष्ट्र राज्य साहित्य अकादमीच्या पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आलेले आहे.