नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवावा – जिल्हाधिकारी संदीप कदम

नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवावा – जिल्हाधिकारी  संदीप कदम 

 ‘हर घर तिरंगा’ उपक्रमाअंतर्गत प्रत्येक घर, कार्यालयांवर राष्ट्रध्वज फडकणार

 जिल्ह्यातील सर्व यंत्रणांना सहभागाचे आवाहन

भंडारा, दि. 19 : जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद, आणि अधिनस्त सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांनी शासनाच्या ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत राष्ट्रध्वज उभारले जावेत यासाठी नियोजन सुरू केले आहे. नागरिकांनी स्वयंप्रेरणेतून आपल्या घरावर राष्ट्रध्वज उभारुन उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवावा, यासाठी यंत्रणांनी नागरिकांना प्रेरीत करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी आज बैठकीत दिले. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय मून यांच्यासह प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

जिल्हा परिषदेच्या वतीने 50 हजारावर राष्ट्रध्वजाची मागणी नोंदविली गेली असल्याचे श्री. मून यांनी यावेळी सांगितले. यासाठी लोकवर्गणी देखील करण्यात यावी, राष्ट्रप्रेम तसेच राष्ट्रभक्तीच्या ग्रामीण भागात ध्वज मिळवून देण्यासाठी ग्रामपंचायतीद्वारे महिला बचतगटाच्या सभासद या कामात मदत करणार असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सांगितले.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षांमध्ये स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्यांबद्दल कृतज्ञता व्यक्त करतानाच 75 वर्षाच्या गौरवशाली परंपरेला, सुधारणांना आपल्या देशाच्या सामर्थ्याला, जनतेपुढे मांडणे, यासाठी प्रत्येकाच्या मनात देशाभिमान जागृत करणे हा स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या अभियानांतर्गत हर घर तिरंगा उपक्रम देशभर राबविण्यात येत आहे. राज्यात हाच उपक्रम आता ‘हर घर तिरंगा ‘ या नावाने राबविण्यात येणार आहे. या अभियानात योग्य आकाराचे कापडाचे तिरंगा ध्वज, सर्वसामान्यांना मिळेल अशी सुविधा उपलब्ध केली जाणार आहे. मात्र प्रत्येक नागरिकांनी स्वयंप्रेरणेने आपल्या घरावर आपला अभिमान असणारा तिरंगा डौलाने फडकेल यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी जिल्ह्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था तसेच सामान्य नागरिकांना केले आहे.

या अभियानाअंतर्गत 11 ऑगस्ट ते 17 ऑगस्ट या कालावधीमध्ये केंद्र शासनाच्या सूचनेनुसार ‘हर घर तिरंगा’ हा उपक्रम राबविण्यात यावा, असे आवाहन करण्यात आले. सर्व शासकीय, निमशासकीय, खासगी आस्थापना, सहकारी संस्था, शैक्षणिक संस्थानी त्यांच्या इमारतीवर व नागरिकांनी स्वतःच्या घरावर राष्ट्रध्वजाची उभारणी स्वयंस्फूर्तीने करण्यासाठी प्रत्येक कार्यालयाने प्रसिद्धी मोहीम राबविण्याचे निर्देश दिले.

नागरिकांनी राष्ट्रध्वज स्वतः विकत घेऊन आपल्या घरावर उभारावा, यासाठी त्यांना प्रेरित करण्याचे स्पष्ट करण्यात यावे. सदर राष्ट्रध्वज उभारणीसाठी प्रत्येक सामान्य माणसाला योग्य मार्गदर्शन केले जावेत, हाताने कातलेल्या किंवा विणलेल्या लोकर, सूत, सिल्क, खादी, कापडापासून बनविलेला झेंडा असेल याची खातरजमा करावी. राष्ट्रध्वज मुबलक प्रमाणात सामान्य नागरिकांना उपलब्ध होईल यासाठीची खात्री बाळगण्याचेही त्यांनी आवाहन केले. राष्ट्रध्वजाबद्दल ध्वज संहिता असून त्याचे पालन झाले पाहिजे. कोणत्याही परिस्थितीत राष्ट्रध्वजाचा अपमान होऊ नये, याबाबतची काळजी घेण्याचेही आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले. आपल्या घरावर तिरंगा लावल्याची छायाचित्रे, चित्रफीत, ध्वनिमुद्रण केंद्र शासनाच्या संस्कृती मंत्रालयाच्या अमृत महोत्सव डॉट एनआयसी डॉट इन या संकेतस्थळावर अपलोड करण्याचे त्यांनी सांगितले.

जिल्ह्याकरीता अडीच ते तीन लाख ध्वजांची गरज असून यासाठी कार्यालय प्रमुखांनी त्यांच्या अधिनस्त अधिकारी-कर्मचाऱ्यांकडून स्वईच्छेने निधी गोळा करून तो निधी तहसीलदार किंवा गटविकास अधिकारी यांच्याकडे द्यावा, असे निर्देश ही जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.