गडचिरोली : पूरपरिस्थितीच्या अनुषंगाने उचित सतर्कता बाळगणेसंदर्भात सावधानतेचा इशारा

पूरपरिस्थितीच्या अनुषंगाने उचित सतर्कता बाळगणेसंदर्भात सावधानतेचा इशारा

गडचिरोली , दि.23: सध्या मान्सून कालावधी असल्याने गडचिरोली जिल्ह्यात वाहणाऱ्या विविध नद्या/उपनद्या तसेच या नद्यांमध्ये नजीकच्या जिल्ह्यातील नद्या/धरणे मधून वेळोवेळी सोडणारे पाणी/विसर्ग यामुळे जिल्ह्यात वाहणाऱ्या नद्या/नाल्यांमध्ये पाण्याच्या पातळीमध्ये वाढ होऊन पूरपरिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तेव्हा जिल्ह्यातील संभाव्य पूरपरिस्थितीवर उचित उपाययोजना करणेस्तव संबंधित सर्व विभागांमध्ये सुसमन्वय असणे गरजेचे आहे.
सध्या गोदावरी नदी ही कालेश्वरम स्टेशन (राज्य तेलंगाणा) येथे इशारा पातळीच्या वर वाहत आहे व गोदावरी नदी ही सिरोंचा नजीकच्या कालेश्वरम येथून प्रवेश करुन पुढे दक्षिण भागात सोमनूर येथे इंद्रावती नदीस मिळते. सध्या नदीच्या पाण्याची वाढती पातळी लक्षात घेता गोदावरी नदीकिनारी गावांनी विशेष सतर्कता बाळगावी. तसेच मेडीगड्डा बॅरेज, ता. सिरोंचा मधून वेळोवेळी सोडण्यात येणारे विसर्गामुळे (सद्यस्थितीत 11.50 लक्ष क्युसेक्स) खालील भागातील गावांमध्ये विशेषत: कोतापल्ली, नदीकुंठा, चिंतरेवला, अंकिसा, आसरअल्ली, सुंकरअल्ली, मुथुपुरम, मुकडीगटृटा, बोम्मेलकोंडा, सोमनूर इत्यादी गावांमध्ये विशेष दक्षता घेण्यात यावी. तहसिलदार सिरोंचा यांनी सदर भागात वेळोवेळी अधिनस्त यंत्रणेमार्फत दवंडी द्यावी तसेच तहसिलदार सिरोंचा यांनी प्राप्त परिस्थितीचा विचार करुन विविध विभागांच्या समन्वयातून आवश्यकता पडल्यास तात्काळ सदर परिसरातील लोकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्याची व्यवस्था करावी.
तसेच प्राणहिता नदीच्या पाणलोट क्षेत्रातील पर्जन्यामुळे आणि वर्धा नदीतून येणाऱ्या अधिकच्या विसर्गामुळे सदर नदीची पाण्याची पातळी वाढत आहे. शिवाय गोसेखुर्द धरणातून सद्यस्थितीमध्ये 4113 क्युमेक्स एवढा विसर्ग सुरु आहे ज्यामुळे वैनगंगा नदीच्या पाण्याची पातळी वाढत आहे.
सबब गोदावरी, प्राणहिता, वैनगंगा नदीकिनारी गावांतील नागरिकांनी विशेष सतर्कता बाळगण्याची दक्षता घ्यावी, असे प्रशासनाकडून आवाहन करण्यात येत आहे.