चंद्रपूर : स्थानिक नैसर्गिक आपत्ती अंतर्गत शेतक-यांनी पीक नुकसानीच्या पूर्वसूचना देण्याचे आवाहन

स्थानिक नैसर्गिक आपत्ती अंतर्गत शेतक-यांनी पीक

नुकसानीच्या पूर्वसूचना देण्याचे आवाहन

चंद्रपूर दि.23 जुलै : खरीप हंगाम 2021 मध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजना राज्यात राबविली जात आहे.  या योजनेत सहभागी झालेल्या शेतकऱ्यांना स्थानिक नैसर्गिक आपत्ती (Localized Calamities) या जोखीमेच्या बाबीअंतर्गत गारपीट, भूस्खलन, विमा संरक्षित क्षेत्र जलमय झाल्यास, ढगफूटी, वीज कोसळल्यामुळे लागणारी नैसर्गिक आग या स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाल्यास विमा संरक्षण प्राप्त होते.

माहे जुलै महिन्यामध्ये राज्यातील काही भागात अतिवृष्टीने तसेच पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाल्याने शेत पिकांचे नुकसान झाल्याचे निदर्शनास येत आहे. पीक विमा संरक्षण घेतलेल्या अधिसूचित पिकांचे उपरोक्त बाबींमुळे नुकसान झाल्यास पीक नुकसान भरपाई मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी शेत पिकांचे नुकसान झाल्यापासून 72 तासामध्ये विमा कंपनीस देणे आवश्यक आहे.

स्थानिक नैसर्गिक आपत्ती या जोखीमेअंतर्गत विमा संरक्षण घेतलेल्या शेतकऱ्यांनी सर्व्हे नंबर नुसार बाधित पीक व बाधित क्षेत्राबाबत घटना घडल्यापासून 72 तासांच्या आत क्रॉप इंश्युरंन्स ॲप, संबंधित विमा कंपनीचे टोल फ्री क्रमांक, बँक, कृषि व महसूल विभाग यांना कळवावे. नुकसान कळवितांना सर्व्हे नंबर व नुकसानग्रस्त क्षेत्र तपशील कळविणे बंधनकारक असेल. या बाबी अंतर्गत नुकसान भरपाई मिळण्यासाठी झालेल्या पीक नुकसानीबाबतची पूर्वसूचना शेतकऱ्यांनी 72 तासादरम्यान वैयक्तिकरित्या मोबाईल ॲपद्वारे, विमा कंपनीच्या टोल फ्री क्रमांक अथवा लेखी स्वरुपात विमा कंपनीच्या तालुका,जिल्हा कार्यालयात किंवा कृषी,महसूल विभागास देणे आवश्यक आहे.

याबाबत अधिक तपशिलासाठी तात्काळ नजीकच्या विभागीय कृषी सहसंचालक, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी यांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे कृषी विभागामार्फत कळविण्यात आले आहे.