यशकथा 13 अल्पभुधारक सुशिक्षीत बेरोजगाराने फळबागेत फुलविली मिश्रपिक शेती/कारल्याचे लाखोंचे उत्पन्न

यशकथा 13 अल्पभुधारक सुशिक्षीत बेरोजगाराने फळबागेत फुलविली मिश्रपिक शेती/कारल्याचे लाखोंचे उत्पन्न

भंडारा हा मुळात धानाचे कोठार.. मात्र निसर्गाच्या अवकृपेमुळे धान पीक घरात येण्याच्या आधीच नष्ट होऊन जात. मात्र या पारंपारिक धान पीक जिल्ह्यात असूनही शेतीत नवीन प्रयोग करणारे अनेक तरुण शेतकरी सध्या आहेत. त्यासोबत नगदी पैसे देणारा भाजीपाला उत्पादनाचे अनेक नवीन प्रयोग या जिल्ह्यात होत आहेत त्यातच कारल्याची शेती करून भरघोस उत्पन्न कमावणारे चंद्रशेखर टेंभुरणें यांची यशोगाथा ही नक्कीच प्रेरणादायी आहे.

त्यांची यशकथा त्यांच्याच शब्दात …

माझे नाव चंद्रशेखर चुन्निलाल टेंभुर्णे मु. मुंडीपार ता. लाखनी येथील रहिवासी असून माझे वय 37 वर्षे माझ्याकडे एकुण जमीन फक्त अर्धा एकर आहे. अत्यल्प शेतीतुन उदरनिर्वाह होणार नाही ही बाब लक्षात घेवून रोजगाराकरीता मी नागपूर गाठले. परंतु कोरोनामुळे पुन्हा मी गावाकडे परतलो. अशातच कृषि विभागाच्या संपर्कातुन आयोजित क्षेत्रीय भेटीला गोंदीया जिल्ह्यातील सडक अर्जुनी तालुक्यातील परीसरात घडुन आली. त्यामध्ये फळबाग व भाजीपाला शेती बघीतली. तसेच अर्जुनी मोरगाव परीसरातील आंबा घन लागवड बघीतली. त्यातुन मला प्रेरणा मिळाली व बागायती शेती करावी म्हणून बोअरवेलचे माध्यमातुन सिंचन सुविधा निर्माण केली.

तालुका कृषि अधिकारी कार्यालयामार्फत रोजगार हमी योजने अंतर्गत आंबा फळबाग लागवड करण्याचे मी ठरविले. व माहे जुलै 2022 मध्ये 0.20 हे.आर. क्षेत्रात आंबा कलमांची अनुदानीत 80 झाडे व अति घन लागवड (High Density) करण्याचे दृष्टीने अधिकची 70 झाडे अशी एकुण 150 झाडे 16 फुट X 5.5 फुट अंतर पध्दतीने लावली. यामुळे मला कमी क्षेत्रात जास्त फळे उत्पादन मिळणार आहे.

आंबा फळपिक व भाजीपाला पिकाला ठिबक सिंचन बसविले. त्याकरीता मला प्रधानमंत्री कृषि सिंचन योजने अंतर्गत अनुदानाचा लाभ मिळाला. प्रथमच आंबा फळपिकात आंतरपिक म्हणून 0.10 हे. क्षेत्रावर कारली पिकाची थंडीच्या कालावधीत (गैर हंगामात) माहे डिसेंबर 2022 मध्ये लागवड केली. त्याकरीता क्रॉप कव्हर तंत्रज्ञानाचा वापर केला. पिकाची जोमाने वाढ झाली व औषध फवारणीच्या खर्चात बचत झाली. सुरुवातीच्या 45 दिवसाच्या कालावधीत बिणाफवारणीने किड व रोगापासुन संरक्षण मिळाले. माहे 15 मार्च 2022 अखेर मला 2 टन उत्पादन व सरासरी 35 रुपये प्रती कि. एवढा दर मिळालेला असुन आतपर्यंत 70 हजार रूपये एवढे उत्पादन मिळाले. अजुन वाढीव 3 टन उत्पन्न मिळणार असुन निश्चितपणे 0.10 हे. क्षेत्रातुन रुपये 1 लक्ष चे निव्वळ उत्पन्न अपेक्षित आहे.

आजच्या युवा पिढीने निराश न होता तंत्रज्ञानाचा वापर करून व्यावसायीक दृष्टीकोनातून भाजीपाला व फळशेती करावी.

शैलजा वाघ-दांदळे जिल्हा माहिती अधिकारी       भंडारा