कला व संस्कृतीमुळेच आदिवासींचा गौरवशाली इतिहास टिकेल: डॉ.अशोक उईके

कला व संस्कृतीमुळेच आदिवासींचा गौरवशाली इतिहास टिकेल: डॉ.अशोक उईके

भगवान बिरसा कला मंच व कै.लक्ष्मणराव मानकर स्मृती संस्थेच्‍या विभागीय फेरीचे बक्षिस वितरण  

आदिवासींची कला व संस्कृती महान असून, त्यांचा इतिहास गौरवशाली आहे. कला व संस्कृतीची जपणूक केली तरच हा गौरवशाली इतिहास टिकेल, असे प्रतिपादन राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ.अशोक उईके यांनी केले.
भगवान बिरसा कला मंच व कै.लक्ष्मणराव मानकर स्मृती संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने गडचिरोली येथील संस्कृती सभागृहात आयोजित भगवान बिरसा कला संगम- पूर्व विदर्भ विभागीय फेरीच्या बक्षीस वितरण समारंभात ते बोलत होते.
कार्यक्रमाल आ. डॉ. मिलिंद नरोटे, माजी खासदार अशोक नेते, माजी आमदार डॉ.नामदेव उसेंडी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विभागीय संघचालक जयंत खरवडे, कै.लक्ष्मणराव मानकर ट्रस्टचे सचिव प्रशांत बोपर्डीकर, बाबूराव कोहळे उपस्थित होते.
डॉ.उईके पुढे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भगवान बिरसा मुंडा यांच्या १५० व्या जयंती वर्षानिमित्त जनजाती गौरव वर्षे साजरे करण्याचे ठरविले. त्याअनुषंगाने आदिवासींची कला व संस्कृती जपण्यासाठी कला संगमचा उपक्रम आयोजित करण्यात आला. यातून आदिवासींची उच्च दर्जाची कला व संस्कृतीची समाजाला ओळख होत आहे. आदिवासींमध्येही उत्तम कलावंत आहेत. परंतु त्यांचं कौतूक होत नाही, अशी खंत व्यक्त करीत डॉ.उईके यांनी राज्य शासनाच्या आदिवासी विकास विभागाने आदिवासींच्या कलेची दखल घेतल्याचे सांगितले. आदिवासींमधील गायन, वादन, हस्तकला, चित्रकला व अन्य कला आणि संस्कृतीवर प्रबंध लिहिण्याची आवश्यकताही डॉ.अशोक उईके यांनी प्रतिपादीत केली.
भगवान बिरसा कला संगमच्या उपक्रमाला आदिवासी समाजातील कलावंतांनी भरघोष प्रतिसाद दिला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आदिवासींच्या उत्थानासाठी सतत प्रयत्नशिल असून, त्यांच्यामुळे आदिवासीबहुल भागातील युवक-युवतींना समाजमाध्यमांवर झळकण्याची संधी मिळत आहे, असेही डॉ.उईके म्हणाले. आदिवासी समाजात सहादेव, सात देव व अन्य देव आहेत. एकच देव असणारे आदिवासी एकमेकांशी लग्न करीत नाही. त्यामुळे देवाची संस्कृती पुढेही टिकविण्यासाठी प्रयत्न करावे, असे आवाहन डॉ.उईके यांनी केले.
याप्रसंगी विविध स्पर्धांमधील विजेत्यांना अतिथींच्या हस्ते स्मृतीचिन्ह व रोख रक्कम देऊन सन्मानित करण्यात आले. दोन दिवस चाललेल्या स्पर्धांचे परीक्षक म्हणून मारोतराव इचोडकर, संजय धात्रक, संजय घोटेकर, लक्ष्‍मण शेडमाके, दुर्गा मडावी, महेश मडावी यांनी काम पाहिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भारत भुजाडे यांनी तर आभार प्रदर्शन राकेश उईके यांनी केले.