लोकसहभागातून प्रगतीची नांदी….. बालेकिल्यातच माओवाद्यांना गावबंदी

लोकसहभागातून प्रगतीची नांदी….. बालेकिल्यातच माओवाद्यांना गावबंदी

• उपविभाग भामरागड अंतर्गत पोस्टे धोडराज हद्दीतील सात (०७) गावांनी केली माओवाद्यांना गावबंदी

सविस्तर वृत्त असे आहे की, माओवादाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी शासन विविध योजना राबवित असते. सन २००३ पासून शासनामार्फत नक्षल गावबंदी योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेच्या अनुषंगाने गडचिरोली पोलीस दलामार्फत पोलीस दादालोरा खिडकिच्या माध्यमातून प्रोजेक्ट उडान अंतर्गत पुरविण्यात आलेल्या विविध शासकिय योजनांच्या लाभामुळे दिनांक १४/०६/२०२४ रोजी उपविभाग भामरागड अंतर्गत पोस्टे धोडराज येथे घेण्यात आलेल्या कृषी मेळाव्यामध्ये हद्दीतील परायणार, नेलगुंडा, कुचेर, कवंडे, गोंगवाडा, मिळदापल्ली व महाकापाडी या सात (०७) गावातील नागरिकांनी एकत्रितपणे येऊन सर्वानूमते नक्षल गावबंदी करुन त्याबाबतचा ठराव प्रभारी अधिकारी पोस्टे धोडराज यांना सादर केला.

वरील सात ही गावे गडचिरोली जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर स्थित असून माओवाद्यांचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या अबुझमाड परिसराच्या अगदी जवळ असल्याने या गावांमध्ये माओवाद्यांचे वर्चस्व होते. तसेच गावातील काही सदस्यांचा माओवाद्यांना पाठिंबा होता. त्यामुळे जिल्हा प्रशासन व पोलीस प्रशासनास त्यांच्यापर्यंत पोहचण्यास अडचणी येत होत्या. त्यामुळे येथील नागरिक हे शासनाप्रती उदासीन होते. परंतू मागील तीन वर्षामध्ये गडचिरोली पोलीस दल पोलीस दादालोरा खिडकिच्या माध्यमातून प्रोजेक्ट उडान अंतर्गत विविध जनजागरण मेळावे, दिव्यांग मेळावे, कृषी सहली, कृषी मेळावे, आरोग्य मेळावे, महिला मेळावे इ. च्या माध्यमातून येथील गावकऱ्यांपर्यंत शासनाच्या विविध योजना पोहचविण्यात यशस्वी झाल्याने पोलीस दलाच्या प्रती येथील गावकऱ्यांचा विश्वास दृढ झाला. यासोबतच अलीकडील काळात या परिसरात ईरपनार येथील मोबाईल टॉवरची उभारणी करण्याकरिता आलेल्या कर्मचाऱ्यांच्या वाहणांची माओवाद्यांकडून करण्यात आलेली जाळपोळ व इतर साहित्यांचे कलेले नुकसान, माओवाद्यांकडून पोलीस खबऱ्या असल्याच्या संशयावरुन करण्यात आलेल्या निष्पाप गावकऱ्यांच्या हत्या व मारहाण, नुकसानीच्या विविध घटना, गावांच्या विकास कामात करण्यात येणारा अडथळा, जनतेला दाखविण्यात येणारा धाक इ. घटनांमुळे माओवादी हे जनतेची दिशाभूल करत आहेत हे गावकऱ्यांच्या लक्षात आले. त्याचाच परिपाक म्हणून दिनांक १४/०६/२०२४ रोजी उपविभाग भामरागड अंतर्गत पोस्टे धोडराज येथे घेण्यात आलेल्या कृषी मेळाव्यामध्ये वरील सात (०७) गावातील गावकऱ्यांनी हा नक्षल गावबंदी ठराव संमत केला तसेच यापूढे गावामार्फत कोणत्याही माओवादी संघटनेस जेवन/राशन/पाणी देणार नाही, त्यांना कसल्याही प्रकारची मदत करण्यात येणार नाही, गावातील नागरिक स्वतः किंवा त्यांच्या मुलाबाळांना माओवादी संघटनेत सहभागी होऊन कोणत्याही प्रकारचे काम करणार नाही किंवा त्यांची ट्रेनिंग करणार नाही, माओवाद्यांच्या मिटींगला जाणार नाही तसेच माओवाद्यांना खोट्या प्रचारास बळी पडणार नाही असे सांगितले. यावेळी मिळदापल्ली येथील गावकऱ्यांनी माओवाद्यांनी पोलीस पथकाला नुकसान पोहचविण्याच्या उद्देशाने खड्डे करुन त्यात पुरुन ठेवलेले धारदार लोखंडी सलाखे (Spikes) काढून आणून पोलीस दलाकडे सुपूर्द

केली.

सदरची कार्यवाही यशस्वीरित्या पार पाडण्यास उपविभागीय पोलीस अधिकारी भामरागड श्री. अमर मोहिते व पोस्टे धोडराज येथील प्रभारी अधिकारी श्री. शरद काकळीज यांनी महत्वाची भूमिका बजावली. सदर नक्षल गावबंदी ठराव करणाऱ्या सात गावातील नागरिकांचे पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल यांनी अभिनंदन केले असून, अबुझमाड जंगल परिसरातील इतर गावातील नागरिकांनी माओवाद्यांच्या खोट्या प्रचाराला बळी न पडता स्वतःच्या व गावाच्या विकासासाठी प्रयत्नशिल राहावे. गडचिरोली पोलीस दल सदैव तुमच्या पाठीशी असून गडचिरोली जिल्ह्यास माओवादी मुक्त जिल्हा करण्यात अशाच प्रकारची मदत करावी असे आवाहन त्यांनी केले.