ना.सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने हृदय शस्त्रक्रियेसाठी चंद्रपुरातील बालके मुंबई फोर्टीज हॉस्पिटल मध्ये दाखल

ना.सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने हृदय शस्त्रक्रियेसाठी चंद्रपुरातील बालके मुंबई फोर्टीज हॉस्पिटल मध्ये दाखल

श्री माता कन्‍यका सेवा संस्‍थेचा उपक्रम

चंद्रपूर, दि. १५ : स्‍व. डॉ. सच्चिदानंद मुनगंटीवार यांच्‍या जयंतीनिमित्‍त २९ ऑक्‍टोंबर २०२३ रोजी राज्‍याचे वन, सांस्‍कृतिक कार्य व मस्‍त्‍य व्‍यवसाय मंत्री मा. ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने श्री माता कन्‍यका सेवा संस्‍था व मुंबई येथील फोर्टीज हॉस्‍पीटल यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने मोफत हृदयविकार तपासणी शिबिर चंद्रपूर येथील वन अकादमीमध्‍ये घेण्‍यात आले होते. तपासणीदरम्‍यान ६४ बालकांना हृदय विकारासंबंधी आजार आढळले ,त्‍यामुळे पहिल्‍या टप्‍प्‍यात गुरुवार, १४ डिसेंबर २०२३ रोजी २५ बालकांना हृदयावरील शस्‍त्रक्रियेसाठी मुंबईतील फोर्टीज हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले आहे.

फोर्टीज हॉस्पिटलमध्‍ये या बालकांवर हृदय शस्‍त्रक्रिया करण्‍यात येणार आहे.  श्री माता कन्‍यका सेवा संस्‍था चंद्रपूर सातत्‍याने हृदयरोग मोफत तपासणी शिबिर, कर्करोग तपासणी शिबिर, नेत्रचिकित्‍सा शिबिर घेत आहे. शिबिरात शस्‍त्रक्रियेकरिता पात्र असलेल्‍या रुग्‍णांना मुंबई, सेवाग्राम, दिल्‍ली, हैद्राबाद व बेंगरूळ इत्यादी ठिकाणी विनामूल्य शस्‍त्रक्रिया करुन घेत आहे. त्‍यामुळे गरिब नागरिकांना मोठा दिलासा मिळून पुढील आयुष्‍य सुदृढ जगण्‍याकरिता मदत होत आहे. त्यातून अनेक कुटुंब उद्ध्वस्त होण्‍यापासून वाचविण्‍यात येत आहेत. मुंबई येथे श्री माता कन्‍यका सेवा संस्‍थेचे सचिव राजेश्‍वर सुरावार व शैलेंद्रसिंग बैस यांच्‍या नेतृत्‍वाखाली बालकांना शस्‍त्रक्रियेसाठी दाखल करण्‍यात आले.

यावेळी भाजपाचे माजी महानगर अध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे, माजी जिल्हा परिषद सभापती ब्रीजभूषण पाझारे, रुग्णसहाय्यक सागर खडसे उपस्थित होते.

संस्थेकडून लोकांच्या जीवनात प्रकाशपेरणी
श्री माता कन्यका सेवा संस्थेची स्थापना २०१७ मध्ये झाली. त्यानंतर संस्थेच्यावतीने सातत्याने आरोग्य सेवा केली जात आहे. नेत्र चिकित्सा शिबिराअंतर्गत आतापर्यंत एक लाखाहून अधिक लोकांची नेत्र तपासणी करण्यात आली. ४८ हजार रुग्णांना चष्म्यांचे वाटप करण्यात आले. श्री माता कन्यका सेवा संस्थेच्यावतीनेच १२ हजार रुग्णांवर सेवाग्राम येथे नेत्र शस्त्रक्रिया करण्यात आली. कोरोना काळातही संस्थेने मोठ्या प्रमाणात नागरिकांची सेवा केली. जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा असो किंवा वैद्यकीय सोयी, प्रत्येक कार्यात संस्था नेहमीच आघाडीवर असते.