गडचिरोली जिल्हयातील चला जाणूया नदीला अंतर्गत नदी संवाद यात्रेचा उद्या समारोप

गडचिरोली जिल्हयातील चला जाणूया नदीला अंतर्गत नदी संवाद यात्रेचा उद्या समारोप

जलपुरूष राजेंद्र सिंह करणार मार्गदर्शन

 

गडचिरोली, दि.20 : नद्यांचे संगोपण करणे ही काळाची गरज बनली आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त ‘चला जाणूया नदीला’ हे अभियान सुरु करण्यात आले आहे. गडचिरोली जिल्हयात वेगवेगळया तीन नदी व उपनदींवर नदी संवाद यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. यामधे कठानी, पोटफोडी, खोब्रागडी व उपनदी सती या नद्यांचा समावेश करण्यात आला होता. याचा समारोप उद्या दि.21 जून रोजी नियोजन भवन, जिलहाधिकारी कार्यालय परिसर येथे सकाळी 11.00 वा. आयोजित करण्यात आला आहे. यावेळी कार्यक्रमात पाणी तज्ञ तथा जलपुरूष राजेंद्र सिंह मार्गदर्शन करणार आहेत. पद्मश्री परशुराम खुणे, खासदार अशोक नेते, आमदार डॉ.देवराव होळी, आमदार कृष्णा गजबे हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून जिल्हाधिकारी संजय मीणा तर विशेष अतिथी म्हणून मुख्य वनसंरक्षक डॉ.किशोर मानकर उपस्थित राहणार आहेत.

 

नदीला जाणून घेणे, तिच्या इतर समस्यांचा अभ्यास करणे, त्यावर उपाय शोधून त्याची कायमस्वरूपी सोडवणूक करणे, जलस्त्रोत वाढविणे यासाठी हे अभियान महत्वपूर्ण ठरणार आहे. जनसामान्यांना नदी साक्षर करणे, नागरिकांच्या सहकार्याने नदींचा सर्वकष उभ्यास व प्रचार करणे, नदींना अमृत वाहिनी बनविण्यासाठी मसुदा तयार करणे, नदीचे स्वास्थ्य आणि मानवी आरोग्य याबाबत प्रचार प्रसार रुपरेषा आखणे, नदीचा तट, प्रवाह, जैवविविधतेबाबत प्रचार प्रसार नियोजन, नदी खोऱ्याचे नकाशे, नदीची पुर रेषा, पाणलोट क्षेत्राचे नकाशे, मातीचे क्षरण, पर्जन्याच्या नोंदी, मागील पाच वर्षातील पूर आणि दुष्काळाच्या नोंदी याची माहिती संकलित करणे, पावसाचे पाणी योग्य जागी अडवून भूजल स्तर उंचावणे, अतिक्रमण, शोषण आणि प्रदुषण या तीन प्रमुख कारणांचा अभ्यास आणि नदी, समाज आणि शासन यांच्यात सुसंवाद प्रस्थापित करणे या प्रमुख उद्देशाने गेले कित्येक दिवस गडचिरोलीमधे नदी संवाद यात्रेचे आयोजन सुरू होते.

 

*सहभागाबद्दल गावांना तसेच विविध स्पर्धेतील विजेत्यांना प्रमाणपत्रांचे वाटप*

नदी संवाद यात्रेमधे समाविष्ट गावांमधून मोठ्या प्रमाणात लोकसहभाग मिळाला. यातील चांगल्या लोकसहभागाबद्दल काही गावांचा सन्मान डॉ.राजेंद्र सिंह यांचे हस्त होणार आहे. तसेच गावागावात जनजागृतीपर पाण्याविषयक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. त्यातील विजेत्या मुलांना प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे.