पूर परिस्थीती निवळतेय…जिल्हयात 42 निवारागृहांत तीन हजाराहून अधिक पूरग्रस्तांना निवारा

पूर परिस्थीती निवळतेय…जिल्हयात 42 निवारागृहांत तीन हजाराहून अधिक पूरग्रस्तांना निवारा

· पूर परिस्थितीमुळे 40 गावांतील नागरिकांची निवारागृहात व्यवस्था

भंडारा, दि. 17 : गेल्या दोन दिवसापासून जिल्हयातील पूरामुळे विस्कटलेली घडी काही अंशी निवळत असून जनजीवन हळूहळू पुर्वपदावर येत आहे. जिल्हयात 42 निवारागृहांत 3313 पूरग्रस्तांना आसरा देण्यात आला आहे. आज पाच वाजताही कारधा लहान पुलाच्या धोका मी पातळीपेक्षा (245.50)पाणी जास्त म्हणजे 247.70 वाहत होते.

भंडारा शहरातील समाजमंदीर, शाळा, सामाजिक सभागृह मिळून पाच ठिकाणी पूरग्रस्तांच्या निवाऱ्यांची व्यवस्था करण्यात आली होती. तर उर्वरीत ग्रामीण भागात 37 ठिकाणी पूरग्रस्तांना ठेवण्यात आले होते. जिल्हयातील प्रकल्पांची स्थिती सायंकाळी पाच वाजता प्राप्त माहितीनुसार, पुजारीटोला धरणाची 6 दारे उघडली असून त्याव्दारे 128.31 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे. धापेवाडा बॅरेजचे सर्व गेट फ्री फलो स्थितीत सुरू असून त्याव्दारे 7644.51 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू असून गोसेखुर्दच्या 33 दाराव्दारे 15072.25 क्युसेक्स पाणी सोडण्यात येत आहे. जिल्हयात आजपर्यत सरासरी 129 टक्के पाऊस झाला आहे.

भंडारा शहरातील 10, पवनी तालुक्यातील 4, तुमसर मधील तामसवाडी ते डोंगरला हा रस्ता व मोहाडी तालुक्यातील 6 व लाखांदूरमधील लाखांदूर ते सोनी ते वडसा रस्ता असे एकूण 22 रस्ते बंद असल्याची माहिती आपत्ती निवारण कक्षाने दिली आहे. कालच्या पूराच्या पाण्याने अनेक नागरी वस्तयांत पाणी शिरल्याने भंडारा शहरातील 354, कारधा 78, गणेशपूर 80, भोजापूर 69, सालेबर्डी 3, दाभा 12, कोथुर्णा 20, दवडीपार येथील 1, करचखेडा येथील 12, पिंडकेपार येथील 1, कोरंभी येथील 4, लावेश्वर 7, खमारी 12, टाकळी 10 कुटुंबाना निवारागृहात आसरा देण्यात आला आहे. तुमसर तालुक्यातील मोहाडी तालुक्यातील 68, लाखांदूर तालुक्याती 15 अशा एकूण 864 कुटुंबातील 3313 नागरिकांना सुरक्षित ठिकाणी निवारा देण्यात आला. पूर परिस्थितीचे दोन बळी नियंत्रण कक्षाने दिलेल्या माहितीनुसार संदीप बाळकृष्ण चौधरी, वय 40 वर्ष रा. किसान चौक, शुक्रवारी भंडारा हे महावितरण येथे लाईनमन म्हणून कार्यरत होते. आज दुपारी बैल बाजार, मेंढा येथे महावितरणच्या कामानिमित्त गेले असता पुराचे पाण्यात बुडाले. त्यांना तात्काळ लक्ष हॉस्पिटल येथे नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. तर काल तुमसर तालुक्यातील मोजा सिलेगाव येथील सिलेगाव -वाहनी नाल्यावरील वाहत्या पाण्याच्या पुलावरून श्यामा सांगोडे वाहून गेले. अदयाप त्यांचा शोध लागला नसुन पोलीस स्टेशन सिहोरा हे कालपासून त्यांचा शोध घेत आहेत. काल रात्री उशिरापर्यत मदत केंद्राची पाहणी व पूरग्रस्त नागरिकांच्या निवास, भोजनाची व्यवस्थेबाबत जिल्हाधिकारी श्री.कदम यांनी स्व्त भेट देवून पाहणी केली. व पूरग्रस्तांच्या सोबतच जिल्हाधिकारी व इतर कार्यरत अधिकारी यांनी जेवण केले. पूराचे पाणी हळूहळू ओसरत असून पाणी ओसरताच सर्व नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्यात येतील, असे जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी कळविले आहे.

जिल्हा प्रशासनाचे नागरिकांना आवाहन

आपत्ती दरम्यान नागरिकांच्या कोणत्याही मदतीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज आहे. आपत्ती दरम्यान प्रशासनान व नागरिकांनी एकमेकांशी समन्वय ठेवून पूर परिस्थितीवर मात करण्यासाठी एकत्रित यावे. सद्यस्थितीत धरण, जलाशय इत्यादींमध्ये पाण्याची पातळी वाढत असून पाण्याचा विसर्गामुळे नदी काठावरील गावांमध्ये संभाव्य पूर परिस्थितीचा धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरी आज रोजी जिल्ह्यात पूरपरिस्थिती नाही. परंतु सद्यस्थितीत धरण, जलाशय, तलाव, नद्या, नाले इत्यादींमध्ये पाण्याची पातळी वाढली असून अशा ठिकाणी पाण्याच्या प्रवाहात उतरू नये. तसेच या ठिकाणी सेल्फी घेण्याचा मोह टाळावा. पाण्यात बोटिंग करताना लाइफ जॅकेटचा वापर करावा तसेच बोटीमध्ये क्षमतेपेक्षा जास्त नागरिकांनी बसू नये. पुलावरून पाणी वाहत असताना नागरिकांनी पूल ओलांडण्याचा प्रयत्न करू नये, या दरम्यान विशेष खबरदारी घ्यावी.