जलजन्य आजार विशेष वृत्त : दिवसा चावणा-या डेंग्यू डासापासून स्वत:चे संरक्षण करा

जलजन्य आजार विशेष वृत्त :

दिवसा चावणा-या डेंग्यू डासापासून स्वत:चे संरक्षण करा

Ø स्वच्छ पाण्यात होते उत्पती

चंद्रपूर, दि.28 जून : पावसाळ्याला सुरुवात झाल्यामुळे या कालावधीत अनेक जलजन्य आजारांची उत्पत्ती होते. आजारांपैकी डेंग्यू हा एक प्रमुख आजार आहे. विशेष म्हणजे डेंग्यूचा डास हा रात्री नाही तर दिवसा चावा घेतो. तसेच याची उत्पत्ती स्वच्छ पाण्यामध्ये होते.

डेंग्यू ताप म्हणजे काय : राज्यातील काही भागातील पाण्याचे दूभिक्ष्य व त्यामुळे जनतेत पाणी साठविण्याच्या प्रवृत्तीत झालेली वाढ आणि डासोत्पत्ती रोखण्यातील निष्काळजीपणा ही डेंग्यूताप उद्रेकाची प्रमुख कारणे आहेत. डेंग्यू ताप हा किटकजन्य आजार असून तो फलॅव्हीव्हायरस प्रकारच्या विषांणूमुळे होतो. त्याचे डेंग्यू-1 ते डेंग्यू- 4 असे चार प्रकार आहेत. डेंग्यू तापाचा प्रसार एडिस एजिप्टाय(टायगरमॉसकिटो) प्रकारच्या डासांच्या मादीमार्फत होतो.

प्रसार कसा होतो : घरातील व परिसरातील साठविलेले स्वच्छ पाण्याचे साठे. (उदा. रांजण, हौद, पाण्याचे मोठे बॅरल, इमारतीवरील पाण्याच्या टाक्या, कुलर्स् , कारंजी, फुलदाण्या इत्यादी) घराच्या परिसरातील टाकलेल्या निरपयोगी वस्तुमध्ये साठलेले स्वच्छ पाणी (उदा. नारळाच्या करवंटया, डबे, बाठल्या, प्लास्टिकची भांडी, रिकाम्या कुंडया, टायर्स् इत्यादी) बांधकामाच्या ठिकाणी असलेले पाण्याचे उघडे साठे.

डेंग्यू तापाच्या रुग्णांस एडिस एजिप्टाय डासाची मादी चावल्यास तिच्या शरीरात डेंग्यू तापाचे विषाणू प्रवेश करतात. साधारपणपणे 8 ते 10 दिवसांत डासांच्या शरीरात डेंग्यू विषाणूंची पूर्ण वाढ झाल्यावर हा दूषित डास कोणत्याही निरोगी व्यक्तीला चावल्यास त्या व्यक्तीस डेंग्यू ताप होऊ शकतो. एकदा दूषित झालेला डास तो मरेपर्यत दूषित राहतो.

रुग्णाची लक्षणे : तीव्रताप, तीव्र डोकेदूखी, स्थायूदूखी व सांधेदूखी, उलटया होणे, डोळयांच्या आतिल बाजूस दुखणे, अंगावर पुरळ, अशक्तपणा, भुक मंदावणे, तोंडाला कोरड पडणे, रक्तातील प्लेटलेटची संख्या कमी होणे, डेंग्यू तापाची लागण ही साथ स्वरुपाची असून त्यातील रुग्णांची संख्या मोठी असते. रुग्ण बेशुध्द होऊ शकतो व गंभीर बेशुध्द अवस्थेला डेंग्यू शॉकसिंड्रोंम असे म्हणतात. यामध्ये मृत्यूचे प्रमाण जास्त असते. रक्तस्त्रावासह डेंग्यूताप (डेंग्यू हेमोरेजिक फिवर) व डेंग्यू शॉक सिंड्रोमच्या रुग्णांना तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करणे आवश्यक आहे.

तापाचे निदान : डेंग्यु तापाचे निश्चित निदान करण्याकरीता रुग्णांच्या रक्ताचे नमुने घेतले जाते. सदर नमुने शासकिय वैद्यकिय महाविद्यालय येथे तपासणीकरीता पाठवून डेंग्यु तापाचे निश्चित निदान करता येते.

उपचार : डेंग्यू तापावर निश्चित असे उपचार नाहीत. वेदनाशामक औषधे व विश्रांती घेणे आवश्यक असते. या रुग्णांना ऑस्पीरिन, ब्रुफेन इत्यादी सारखी औषधे देवू नयेत. डेंग्यू तापाच्या रुग्णांना वयोमानानुसार पॅरेसिटेमॉल गोळयांचा उपचार करावा.

प्रतिबंधक / नियंत्रणासाठी उपाययोजना : डास नियंत्रणासाठी उपाययोजनेंतर्गत डासोत्पत्ती स्थानामध्ये डासाच्या अळया खाणारे गप्पी मासे सोडावेत. आठवडयातून किमान एका ठराविक दिवशी कोरडा दिवस पाळावा. घरातील पाणी साठयाची भांडी, माठ, रांजण, सिमेंटची टाकी आठवडयातून किमान एकदा रिकामी करून घासून पुसून कोरडी करावी व नंतर त्यात पाणी भरावे. घराच्या परिसरातील किंवा घराच्या छतावरील निरुपयोगी वस्तु नष्ट करावी. डासांपासून व्यक्तीगत सुरक्षिततेसाठी मच्छरदाणीचा वापर, डासप्रतिरोध क्रिमचा वापर, डेंग्युचा डास हा दिवसा चावत असल्यामुळे शरीर पूर्ण झाकेल असे कपडे घालणे, घर व घराचा परिसर तसचे कार्यालयीन कामाच्या ठिकाणी व शाळेत स्वच्छता नविन बांधकाम सुरु असलेल्या ठिकाणी पाणी साचु देऊ नये.

टायर आणि भंगार इ. निरोपयोगी सामानामध्ये पाणी साठुन राहणार नाही याची दक्षता घ्यावी. निरोपयोगी प्लॅस्टीकच्या वस्तुची विल्हेवाट लावावी. घरातील सर्व पाणी साठयांना हवाबंद झाकणे बसवावित किंवा पातळ स्वच्छ फडक्याने बांधुन ठेवावे ज्यामुळे डास आत जाऊन अंडी घालणार नाही. रिकाम्या भुखंडावर पाणी कचरा किंवा पाणी साचणार जाणार नाही याची दक्षता घ्यावी. शोषखडयाचा वापर करण्यात यावा.

फ्रिजचा ड्रिपपॅन, कुलर, फुलदाणी, यातील पाणी बदलत राहावे. कुंडयातील पाण्याचा दर तीन दिवसाने निचरा करावा. फुलाच्या कुंडयामध्ये लाल मातीचा वापर करावा. पाण्याची टाकी घरात असल्यास ती झाकण लावून बंद करून ठेवावी. खिडक्यांवर घट्ट जाळी किंवा काच लावावी आणि दरवाजेसुध्दा बंद करून ठेवावे, जेणेकरुन डास घरात येणार नाहीत. डेंग्यू ताप नियंत्रणसाठी शासकीय प्रयत्नांबरोबरच जनतेचे सक्रिय सहकार्य अत्यंत आवश्यक आहे. चंद्रपुर जिल्हयात सन 2021 मध्ये ग्रामीण भागात 326 व शहरी भागात 265 असे एकूण 591 डेंग्युचे रुग्ण आढळुन आलेले होते. त्यापैकी 5 रुग्णाचा मृत्यु झाल्याचे आरोग्य विभागाने कळविले आहे.