स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात यंत्रणांनी सक्रिय सहभाग वाढवावा           – जिल्हाधिकारी संदीप कदम जिल्ह्यातील ऐतिहासिक शाळेचा होणार विकास                                                 ‘स्वराज्य महोत्सव’ चे 9 ते 15 ऑगस्ट दरम्यान आयोजन                                               हुतात्मा स्मारकांचे सुशोभीकरण करण्याचा निर्णय

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात यंत्रणांनी सक्रिय सहभाग वाढवावा

          – जिल्हाधिकारी संदीप कदम

  • जिल्ह्यातील ऐतिहासिक शाळेचा होणार विकास                                                
  • ‘स्वराज्य महोत्सव’ चे 9 ते 15 ऑगस्ट दरम्यान आयोजन                                              
  • हुतात्मा स्मारकांचे सुशोभीकरण करण्याचा निर्णय

भंडारा, दि. 18 : देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त जिल्ह्यात विविध कार्यक्रम आयोजित  करण्यात यावेत. जिल्हा परिषद, समाज कल्याण, कृषी विभाग, आदिवासी विभाग यासह अन्य यंत्रणांनी  सक्रिय सहभाग वाढवावा. आझादी का अमृतमहोत्सवाबाबत देशात अनेक उपक्रम राबवत असतांना भंडारा जिल्ह्यानेही वैशिष्ट्यपुर्ण कार्यक्रमाचे नियोजन करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी आज दिले.

नियोजन सभागृहात आयोजित जिल्हास्तरीय बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी विनय मुन, अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप चौधरी, निवासी उपजिल्हाधिकारी महेश पाटील, जिल्हा माहिती अधिकारी शैलजा वाघ उपस्थित होत्या.

 शासन निर्देशानुसार स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त प्रत्येक जिल्ह्यातील एका ऐतिहासिक शाळेचा विकास करावयाचा आहे. अशा शाळेची निवड करून त्याठिकाणी करावयाच्या कामांचे स्वरूप, अपेक्षित खर्च याविषयीची माहिती सर्व जिल्ह्यातील संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने सादर करावी. तसेच हुतात्मा स्मारकांची डागडुजी, सुशोभीकरण करण्याची कार्यवाही 8 ऑगस्टपर्यंत पूर्ण करावी. जिल्ह्यातील प्रमुख शासकीय इमारतींवर स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे बोधचिन्ह प्रदर्शित करावे. ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग बांधव, तृतीयपंथीय यांच्यासाठी विशेष शिबिरे घेवून त्यांना शासकीय योजनांचा लाभ देण्यासाठी प्रयत्न करावा, अशा सूचना संदीप कदम यांनी दिल्यात.

राज्यात 9 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट 2022 दरम्यान स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत ‘स्वराज्य महोत्सव’ आयोजित करण्यात येणार आहे. त्यादृष्टीने जिल्हास्तरावर नियोजन करावे. ‘हर घर झेंडा’ उपक्रम राबविण्यासाठी आवश्यक जनजागृती करावी. नागरिकांना भारतीय ध्वज संहितेची माहिती देवून घरावर, शासकीय कार्यालयांवर राष्ट्रध्वज लावण्याबाबत आवाहन करावे. जिल्ह्यातील प्रमुख रस्त्यावर रस्ते संग्रहालय उभारण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने नियोजन करावे. जिल्हा वार्षिक योजनेच्या नाविन्यपूर्ण योजनेतून स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त विशेष उपक्रम राबविण्यासाठी निधी उपलब्ध होण्यासाठी प्रयत्न करावा, असे जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले.

जिल्हा माहिती अधिकारी शैलजा वाघ यांनी अमृत महोत्सवांच्या राष्ट्रीय संकेतस्थळावर जिल्ह्यातील 44 कार्यक्रम अपलोड झाल्याची माहिती यावेळी दिली. तसेच जिल्ह्यांच्या संबंधित अधिकाऱ्यांनी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त हाती घेण्यात आलेल्या उपक्रमांची माहिती दिली.