चिचडोह बॅरेजचे सर्व दरवाजे 15 ऑक्टोबर पासून क्रमाक्रमाने बंद

चिचडोह बॅरेजचे सर्व दरवाजे 15 ऑक्टोबर पासून क्रमाक्रमाने बंद

चंद्रपूर दि. 11 ऑक्टोबर : मुख्य अभियंता, जलसंपदा विभाग, नागपूर यांनी मंजूर केलेल्या द्वार संचलन कार्यक्रमानुसार वैनगंगा नदीवरील चिचडोह बॅरेजचे 15 मीटर लांबीचे व 9 मीटर उंचीचे 38 पोलादी दरवाजे बंद करून पाणीसाठा करण्याचे नियोजित आहे.
त्याकरीता दि. 15 ऑक्टोबर 2021 पासून सर्व दरवाजे द्वार संचलन कार्यक्रमानुसार, प्रथम नदीकाठावरील व क्रमाक्रमाने नदीच्या मध्यभागातील द्वारे बंद करण्यात येणार आहेत. त्यामुळे नदीपात्रात ऊर्ध्व बाजूस व नदीत आलेल्या उपनद्या व नाल्यांमध्ये पाणीसाठा निर्माण होऊन नदीतील पाण्याची पातळी वाढणार आहे. नदी व नाल्यातील वाढलेल्या पाणीसाठ्यामुळे जिवीत व वित्तहानी होऊ नये म्हणून सर्व लगतची गावे व ग्रामपंचायतींनी आपल्या गावकऱ्यांना याबाबत दवंडीद्वारे सूचित करावे. तसेच नदीकाठावर जाणे टाळण्याच्या, नदीकाठावरील शेतामध्ये कामे करतांना सतर्क राहण्याच्या सूचना द्याव्यात.
या कार्यालयाकडून ज्या शेताचे भूसंपादन, सरळ खरेदी करण्यात आली आहे व येत आहे, त्या सर्व भूधारकांनी शेतातील कामे करतांना खबरदारी घ्यावी किंवा या कार्यालयाने बुडीत क्षेत्रासाठी संपादित केलेल्या शेतामध्ये शेतीची कोणतीही कामे करू नयेत. तसेच मासेमारी करणारे, पशुपालक यांनी
प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रातून नदी ओलांडू नये, रेती घाटातून रेती काढणारे, नदी पात्रात इतर काम करणाऱ्या लोकांनी खबरदारी घ्यावी. कोणत्याही प्रकारच्या नुकसानीस लघु पाटबंधारे विभाग हे कार्यालय जबाबदार राहणार नाही, याची नोंद घ्यावी. असे लघु पाटबंधारे विभागाचे उपकार्यकारी अभियंता यांनी कळविले आहे.