अमली पदार्थ प्रकरणात पोलीसांचा सहभाग आढळल्यास कडक कारवाई – गृहराज्यमंत्री योगेश कदम

अमली पदार्थ प्रकरणात पोलीसांचा सहभाग आढळल्यास कडक कारवाई – गृहराज्यमंत्री योगेश कदम

मुंबई, दि. २४ : सांगली जिल्ह्यासह तासगाव तालुक्यात वाढत असलेल्या अमली पदार्थांच्या जाळ्याबाबत राज्य सरकारची ‘झिरो टॉलरन्स’ भूमिका आहे. अमली पदार्थ प्रकरणांत पोलिसांचा सहभाग आढळल्यास कडक कारवाई केली जात आहे. आतापर्यंत १५ पोलिस कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्यात आले असून १० जणांना निलंबित करण्यात आले आहे. अमली पदार्थांचे नियंत्रण करण्यासाठी कोणत्याही स्तरावर सहनशीलता दाखवली जाणार नसल्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी आज विधानसभेत सांगितले.

सांगली जिल्ह्यातील तसेच तासगाव तालुक्यातील अमली पदार्थांच्या वाढत्या जाळ्यासंदर्भात सदस्य रोहित पाटील यांनी अर्धातास चर्चा उपस्थित केली होती. यावर गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी उत्तर दिले. सदस्य अभिजित पाटील, हेमंत ओगले यांनी चर्चेत सहभाग घेतला.

गृहराज्यमंत्री योगेश कदम म्हणाले, सांगली जिल्ह्यात अलीकडेच करण्यात आलेल्या कारवाईत पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर अमली पदार्थ निर्मिती करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश केला. गुजरातमधून आणलेल्या कच्च्या मालाच्या आधारे औद्योगिक वसाहतीत ड्रग तयार करण्याचे काम सुरू असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी सुमोटो कारवाई करत संपूर्ण साखळी उद्ध्वस्त केली. यामध्ये कच्चा माल पुरवठादार, उत्पादक, विक्रेते आणि पेडलर्स अशा सर्व स्तरांवरील आरोपींना अटक करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

राज्यात अमली पदार्थांविरोधात विशेष मोहीम राबविण्यात येत असून ‘अँटी नार्कोटिक्स टास्क फोर्स’ स्थापन करण्यात आली आहे. ही यंत्रणा केवळ ड्रगविरोधी कारवाईवर लक्ष केंद्रित करणार असून संबंधित कर्मचाऱ्यांना प्रोत्साहनपर योजना आणि बढतीसाठी विशेष तरतूद करण्याचा विचार सुरू असल्याचे श्री. कदम यांनी स्पष्ट केले.

एनडीपीएस कायद्याअंतर्गत कडक कारवाई केली जात असून, मोठ्या प्रमाणातील (कमर्शियल क्वांटिटी) गुन्ह्यांमध्ये अधिक कठोर तरतुदींचा वापर केला जात आहे. मागील दीड वर्षांत राज्यात अमली पदार्थांशी संबंधित गुन्हे दाखल करण्यात लक्षणीय वाढ झाली असून, सुमारे १७,५०० पेक्षा अधिक गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ही संख्या पूर्वीच्या तुलनेत मोठ्या प्रमाणात वाढलेली असल्याचे त्यांनी सांगितले.

सांगली जिल्ह्यातील परिस्थितीचा प्रत्यक्ष आढावा घेण्यासाठी आपण स्वतः दौरा करणार असून या दौऱ्यात सर्व लोकप्रतिनिधींना सहभागी करून घेत व्यापक आढावा घेतला जाईल. तसेच शाळा, महाविद्यालये आणि तरुणांमध्ये जनजागृती मोहीम राबवून अमली पदार्थांच्या दुष्परिणामांबाबत जागरूकता वाढविण्यात येणार आहे, असे श्री. कदम यांनी सांगितले.

पालकमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली सांगली जिल्ह्यात अँटी ड्रग टास्क फोर्स कार्यरत असून, जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील समितीद्वारे दरमहा आढावा घेतला जात आहे. उपलब्ध माहिती आणि पुराव्यांच्या आधारे कठोर कारवाई सुरू राहील, असेही श्री. कदम यांनी स्पष्ट केले. अमली पदार्थमुक्त सांगली हा उद्देश ठेवून प्रशासन आवश्यक ती सर्व पावले उचलणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.