राज्यात अनधिकृत कत्तलखान्यातील गोहत्या बंदीसाठी विशेष मोहीम – गृहराज्यमंत्री योगेश कदम
मुंबई, दि. १७: राज्यात कुठेही गोहत्या सहन केल्या जाणार नाही. यासंदर्भात शासन कठोर कारवाई करेल. राज्यात अनधिकृत कत्तलखान्यांत गोहत्या प्रकरणी अशा अनधिकृत कत्तलखान्यांवर विशेष मोहीम राबवून कारवाई करण्यात येईल, असा इशारा गृहराज्यमंत्री (शहरे) योगेश कदम यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात दिला.
गो हत्या बंदीबाबत सदस्य संजय उपाध्याय यांनी लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती. या सूचनेच्या चर्चेमध्ये सदस्य सर्वश्री अमोल खताळ, अतुल भातखळकर, असलम शेख, प्रवीण दटके यांनी सहभाग घेत उपप्रश्न उपस्थित केले.
गोहत्येचा गुन्हा वारंवार करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यासाठी कायद्यात सुधारणा करण्याचे सांगत गृहराज्यमंत्री श्री. कदम म्हणाले, गोहत्या गुन्हे वारंवार करणाऱ्या गुन्हेगारांना १० वर्षाची शिक्षा व दंडात वाढ करण्यासाठी सद्यस्थितीत असलेल्या कायद्यात सुधारणा करण्यात येईल. अशा गुन्हेगारांवर मकोका कायद्याअंतर्गत कारवाई करण्यासाठी पडताळणी करण्यात येईल. गोरक्षक किंवा काही स्वयंसेवी संस्था गो हत्येची माहिती स्वतःहून पोलिसांना देतात. अशा प्रकरणात पोलिसांकडून कारवाई करण्यात येते. स्वयंसेवी संस्था, गोरक्षक आणि पोलिसांमध्ये समन्वय करण्यात येईल. तसेच गोरक्षकांना ओळखपत्र देण्याबाबत पडताळणी करून कार्यवाही करण्यात येईल.
पशुसंवर्धन विभागाच्या माध्यमातून राज्यात गोशाळा चालवण्यात येतात. यामध्ये वृद्ध, दुधाळ नसलेल्या, रस्त्यावरील जनावरांना ठेवण्यात येते. यासाठी शासन मदत करेल. बदलापूर (पश्चिम) येथे पोलिसांनी कारवाईत एका आरोपीस अटक करण्यात आली. इतर दोन आरोपींचा शोध घेण्यात येत आहे. यवतमाळ जिल्ह्यातील वणी शहरातील गोमांस सापडलेल्या हॉटेलवर कारवाई करण्यात येईल. आवश्यकतेनुसार हॉटेलचे परवाना रद्द करण्यात येईल, असेही गृहराज्यमंत्री श्री. कदम यांनी सांगितले.