चंद्रपूर औद्योगिक क्षेत्रातील उद्योगांना चालना देण्यासाठी विविध उपाययोजना सुरू – उद्योग राज्यमंत्री इंद्रनील नाईक

चंद्रपूर औद्योगिक क्षेत्रातील उद्योगांना चालना देण्यासाठी विविध उपाययोजना सुरू – उद्योग राज्यमंत्री इंद्रनील नाईक

मुंबई, दि. १४ : चंद्रपूर जिल्ह्यातील आकापूर – मारेगाव औद्योगिक क्षेत्रामध्ये १९४.२६ हेक्टर जमीन संपादित करण्यात आली असून, या परिसरात औद्योगिकरणाला चालना देण्यासाठी विविध उपाययोजना सुरू आहेत. चंद्रपूर औद्योगिक क्षेत्रातील ५० भूखंड ऑनलाईन प्रणालीद्वारे उद्योगांसाठी उपलब्ध करून देण्यात आले होते, त्यापैकी ४८ भूखंडांचे वाटप पूर्ण झाले असून १० भूखंडावर उद्योग सुरू असल्याची माहिती उद्योग राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी विधान परिषदेत दिली.

सदस्य उमा खापरे, प्रवीण दरेकर यांनी एमआयडीसीमार्फत चंद्रपूर जिल्ह्यातील उद्योगांना देण्यात सोयीसुविधेनुसार तेथील स्थानिकांना रोजगार मिळावा, यासंदर्भात प्रश्न विचारला होता, त्यावेळी ते बोलत होते.

राज्यमंत्री नाईक म्हणाले की, मागील चार वर्षांमध्ये चंद्रपूर औद्योगिक क्षेत्रात १० मोठे उद्योग स्थापित झाले आहे. या औद्योगिक क्षेत्रात सुमारे ३,०७५ कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित असून, जवळपास ४,७९५ रोजगाराच्या संधी निर्माण होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तथापि, काही उद्योग विशेषतः स्टील उद्योगांमुळे पर्यावरण परवानग्यांमध्ये होणाऱ्या विलंबामुळे त्यांच्या कामकाजास अडथळे येत आहेत. या पार्श्वभूमीवर, ४८ पैकी १८ भूखंडधारकांनी आजपर्यंत कोणतेही काम सुरू केलेले नाही, अशी माहिती देण्यात आली. त्यामुळे अशा भूखंडांचे वितरण रद्द करून ते परत घेण्याचा निर्णय घेतला जात असल्याचे सांगण्यात आले.

याचबरोबर, एमआयडीसीत राईस मिल क्लस्टर तयार करण्याचा प्रस्ताव असून, स्थानिक शेतकऱ्यांच्या धान्य उत्पादनाला आधार देणारा हा प्रकल्प पुढील सहा महिन्यांत १००% कार्यरत करण्याचा शासनाचा मानस असल्याचे राज्यमंत्र्यांनी सांगितले.