अमृत 2.0 अंतर्गत खोदण्यात आलेल्या रस्त्यांची पुनर्बांधणी सुरु

अमृत 2.0 अंतर्गत खोदण्यात आलेल्या रस्त्यांची पुनर्बांधणी सुरु

चंद्रपूर 8 जुलै – शहरातील पायाभूत सुविधा अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने केंद्र शासन पुरस्कृत अमृत 2.0 (Atal Mission for Rejuvenation and Urban Transformation) योजनेअंतर्गत महत्त्वाचे प्रकल्प मनपातर्फे हाती घेण्यात आले आहेत. या योजनेअंतर्गत वाढीव पाणीपुरवठा यंत्रणा तसेच मलनिःस्सारण योजनेच्या कामासाठी शहरातील विविध भागांमध्ये अनेक रस्त्यांवर खोदकाम करावे लागले होते. या रस्त्यांचे पुनर्बांधकाम, मजबुतीकरण व डांबरीकरणाचे काम टप्प्याटप्प्याने करण्यात येत आहे.

पाणीपुरवठा योजनेअंतर्गत शहरात आजपावेतो 47 किलोमीटर पाईपलाईन टाकण्यात आली असुन विठ्ठल मंदिर,ठक्कर कॉलोनी,पठाणपुरा,एकोरी वॉर्ड येथील रस्त्यांचे काम पुर्ण करण्यात येत आहे.इरई धरणावर नवीन इंटेक वेल व जॅकवेलचे काम प्रस्तावित असुन येथुन अतिरिक्त पाणी उचल करण्यात येणार आहे. तसेच तुकूम येथे 53 दशलक्ष लिटर क्षमतेचे नवीन जलशुद्धीकरण केंद्र उभारण्यात येत असुन 6 नवीन जलकुंभ सुद्धा उभारण्यात येणार आहे. तर 38 हजार नवीन नळ जोडणी करण्यात येणार आहे.

मलनिःस्सारण योजनेअंतर्गत 32 किलोमीटर पाईपलाईन टाकण्यात आली असुन पागल बाबा नगर,विठ्ठल मंदिर,ठक्कर कॉलोनी,बाबुपेठ, गोपाळपुरी,नरेंद्रनगर इंडस्ट्रिअल येथील रस्ता पुनर्बांधणीचे काम सुरु आहे.शहराची वाढती लोकसंख्या बघता मलनिःस्सारणाची योग्य व्यवस्था हे दीर्घकालीन नियोजनाचे पाऊल आहे.

यामुळे मोकळ्या नाल्यांमध्ये सांडपाणी जाण्याऐवजी ते प्रक्रिया केंद्रात गेल्याने शहरात दुर्गंधी आणि घाणीचे प्रमाण कमी होणार आहे. पुनर्वापर केलेले सांडपाणी बागायती,सिमेंट उद्योग,औद्योगिक वापर,वाटर स्प्रे बांधकामासाठी वापरता येईल. खुल्या नाल्यांमुळे रोगकारक जंतु व जी दुर्गंधी पसरते त्यावर मलनिःस्सारण प्रकल्पामुळे आळा घालता येऊ शकतो. तसेच यामुळे सुदृढ आरोग्य पातळीत वाढ होऊन मच्छरांचा त्रासही कमी होतो.

सदर कामांमुळे काही भागांतील नागरिकांना तात्पुरती गैरसोय झाली असली, तरी या दीर्घकालीन प्रकल्पांमुळे शहराला भक्कम व टिकाऊ पायाभूत सुविधा प्राप्त होणार आहेत. चंद्रपूर महानगरपालिकेच्या वतीने नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.