चंद्रपूर जिल्ह्यासाठी 14 एप्रिल पर्यंत अलर्ट जारी

चंद्रपूर जिल्ह्यासाठी 14 एप्रिल पर्यंत अलर्ट जारी

चंद्रपूर, दि. 11 : नागपूर प्रादेशिक हवामान केंद्राने दिलेल्या सूचनेनुसार 11 ते 14 एप्रिल 2024 या कालावधीत चंद्रपूर जिल्ह्यासाठी अलर्ट जारी केला आहे. त्यानुसार 11 ते 12 एप्रिल या कालावधीत ऑरेंज अलर्ट जारी केला असून या कालावधीत जिल्‍ह्यात एक दोन ठिकाणी विजांच्या कडकडाट आणि सोसाट्याचा वारा (ताशी 50-60 किमी वेगाने) गडगडाटी वादळासह गारपीट ची शक्यता वर्तवली आहे. तसेच 13 व 14 एप्रिल, 2024 या कालावधीकरीता यलो अलर्ट असून एक-दोन ठिकाणी विजांच्‍या कडकडाटासह मेघगर्जनेची शक्‍यता वर्तविली आहे.

खबरदारीची उपाययोजना म्हणून नागरिकांनी घ्यावयाची : संरक्षणात्‍मक कपडे घाला आणि घरात आश्रय घ्‍या. मुसळधार पाऊस आणि जोरदार वारा असताना खिडक्‍या आणि दरवाज्‍यापासून दूर रहा. रोडवे, अंडरपास, ड्रेनेजचे खड्डे, सखल भाग आणि जिथे पाणी साठते अशा भागातून जाणे टाळा. खराब दृश्‍यमानतेमुळे मुसळधार पाऊसात वाहने चालवणे टाळा. पॉवर लाईन्‍स किंवा विजेच्‍या तारांपासून दूर रहा. फ्लॅश पूर चेतावणी किंवा विजेच्‍या तारांपासून दूर रहा.

वादळमेघगर्जना आणि आकाशात विजा चमकत असताना : काय करावे आणि काय करु नये

विजेच्या गडगडाटासह पावसाची पूर्वकल्पना असल्यास बाहेर जाणे टाळा. जर मोकळ्या जागेत असाल आणि जवळपास कुठल्याही सुरक्षित इमारतीचा आसरा नसेल, तर सखल जागेत जाऊन गुडघ्यात डोके घालून बसा. आकाशात विजा चमकत असल्यास घरात किंवा सुरक्षित इमारतीत आश्रय घ्या. घराच्या बाल्कनी, छत अथवा घराबाहेरील ओट्यावर थांबू नका. आपण घरात असाल आणि घरातील विद्युत उपकरणे चालू असतील तर त्या वस्तू त्वरित बंद करा. तारांचे कुंपण, विजेचे खांब व इतर लोखंडी वस्तूंपासून दूर रहा. पाण्यात उभे असाल तर तात्काळ पाण्यातून बाहेर पडा. आकाशात विजा चमकत असल्यास घरातील लँडलाईन फोनचा वापर करू नका. शॉवरखाली अंघोळ करू नका. घरातील बेसिनचे नळ, पाण्याची पाईपलाइन यांना स्पर्श करू नका तसेच कुठल्याही विद्युत उपकरणांचा वापर करू नका. विजेच्या गडगडाटासह वादळी वारे चालू असताना लोखंडी धातूच्या सहाय्याने उभारलेल्या तंबूमध्ये किंवा शेडमध्ये आसरा घेऊ नका. उंच झाडाच्या खाली आसरा घेऊ नका. धातूंच्या उंच मनोऱ्याजवळ उभे टाकू नका. जर आपण घरात असाल तर उघड्या दारातून अथवा खिडकीतून वीज पडताना पाहू नका. हे बाहेर थांबण्याइतकेच धोकादायक आहे.

जिल्‍ह्यातील नागरिकांनी उचित काळजी घ्‍यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्‍यात आले आहे.