आज शहरात तीव्र उष्णतेची लाट (Heat Wave) हवामान विभागाचा यलो अलर्ट नागरिकांना सतर्कतेचा इशारा

आज शहरात तीव्र उष्णतेची लाट (Heat Wave)
हवामान विभागाचा यलो अलर्ट
नागरिकांना सतर्कतेचा इशारा

चंद्रपूर 04 एप्रिल – हवामान विभागाच्या अंदाजानुसार, उद्या दि.5 एप्रिल रोजी चंद्रपूर शहरात दिवसा तसेच रात्रीही उष्णतेची लाट राहणार असुन याबाबत यलो अलर्ट देण्यात आला आहे.यंदा एप्रिल महिन्याच्या सुरवातीलाच प्रचंड उकाडा जाणवू लागला असुन सर्वांना उष्णतेच्या झळा सोसाव्या लागत आहेत. त्यामुळे उष्णतेच्या लाटेचा सामना करण्यास सतर्क राहण्याचा इशारा चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे देण्यात येत आहे.
तीव्र उष्णतेच्या पार्श्वभूमीवर आयुक्त विपीन पालीवाल यांच्या मार्गदर्शनात व वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.वनिता गर्गेलवार यांच्या प्रत्यक्ष नियंत्रणात    मनपा आरोग्य विभागामार्फत उष्माघात कृती आराखडा राबविण्यात येत असुन उष्माघाताचा धोका टाळण्यास विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. तीव्र उन्हात नागरिकांनी शक्यतो दुपारी 12 ते 4 या वेळेत बाहेर पडणे टाळावे, घर थंड राहण्यास नागरीकांनी कुल रूफ टेक्नोलॉजीचा वापर करावा म्हणजेच उष्णतारोधक रंग जर घराच्या छतावर लावले तर 2 ते 3 डिग्री तापमान कमी होण्यास मदत मिळते. उष्माघातामुळे निर्माण होणाऱ्या आपातकालीन परिस्थितीप्रसंगी रुग्णवाहिकेला बोलाविण्यास 108 क्रमांकही उपलब्ध करून देण्यात आला आहे.
ट्रॅफीक सिग्नलवर नागरीकांना अधिक काळ उभे राहावे लागु नये याकरीता 12 ते 3 या कालावधीत ट्रॅफीक सिग्नल बंद ठेवण्याच्या सुचना वाहतुक विभागाला देण्यात आल्या आहेत. मनपा क्षेत्रातील उद्याने सकाळी 9 ते रात्री 9 वाजेपर्यंत सुरु ठेवण्यात येऊन नागरिकांना सावलीचा आश्रय मिळेल याची व्यवस्था करण्यात येत आहे.तसेच उष्माघाताचा धोका टाळण्यास नागरीकांसाठी जिल्हा सामान्य रुग्णालय येथील ‘ शीत वार्ड ‘ ची व्यवस्था करण्यात आली  आहे.

तीव्र उन्हात काय करावे व काय करू नये –

 यलो अलर्टच्या कालावधीमध्ये भर उन्हात म्हणजे साधारणतः दुपारी 12 ते 4 वाजेपर्यंत उन्हात जाणे टाळावे.
 कमी वजनाचे, सौम्य रंगाचे आणि सुटसुटीत कपड्यांचा वापर या दिवसांमध्ये करावा.
 उन्हामुळे फार घाम येत असल्याने शरीरातील पाण्याचं प्रमाण कमी होतं, ते कायम राखण्यासाठी या दिवसांमध्ये अधिक पाणी प्या.
 दारु, चहा, कॉफी, सोडा असणारी शीत पेयांचं सेवन टाळा. या पदार्थांमुळे शरीरातील पाण्याचं प्रमाण कमी होतं.
 घरगुती पेय ज्यामध्ये लस्सी, ताक, लिंबूपाणी, तोरणी (तांदळाचं पाणी),आंब्याचे पन्हे, नारळ पाणी  यासारख्या गोष्टींची सेवन केल्यास डिहायड्रेशन होत नाही.
 डोक्यावर टोपी किंवा स्कार्फ किंवा रुमाल बांधावा. उन्हात डोकं उघडं राहणार नाही याची काळजी घ्यावी.
 लहान मुलं, वयस्कर व्यक्ती तसेच आरोग्य विषयक समस्या असणाऱ्यांची विशेष काळजी या दिवसांमध्ये घ्यावी.
 थंड जागेत, वातावरणात राहावे तसेच थंड पाण्याने अंघोळ करावी .
 शिळे अन्न व उच्च प्रथिने असलेले पदार्थ खाणे टाळावे
 उन्हात प्रवास करताना डोळ्यांना गॉगल लावा,टोपी,छत्री यांचा वापर करावा.

उष्माघाताची लक्षणे –
 अस्वस्थपणा, थकवा येणे, शरीर तापणे, अशक्तपणा, अंगदुखी, डोकेदुखी, मळमळणे ही लक्षणे आढळल्यास थंडगार पाण्याने अंघोळ करावी. ( डोक्यावरून गार पाण्याने अंघोळ केल्याने तापलेले शरीर थंड होण्यास मदत होते ) थंड जागेत आराम करावा, परिश्रमाचे काम करू नये, भरपूर थंड पाणी प्यावे, तसेच मनपा आरोग्य केंद्रात किंवा जिल्हा सामान्य रुग्णालयात त्वरित औषधोपचार करवून घ्यावा.