जलयुक्त शिवार अभियानाचा जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा

जलयुक्त शिवार अभियानाचा जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा

चंद्रपूर,दि.13: राज्य शासनाच्यावतीने जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियान 2.0 राबविण्यात येत असून शासनाचे महत्वकांक्षी अभियान आहे. या अभियानाची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी आज वीस कलमी सभागृहात आढावा बैठक घेतली. तसेच सुधारित आराखडे असल्यास मंजुरीसाठी पाठविण्याच्या सूचना दिल्या.

बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, उपवनसंरक्षक श्वेता बोड्डू, उपजिल्हाधिकारी (रोहयो) अजय चरडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार, विभागीय वन अधिकारी प्रशांत खाडे, सहाय्यक वनसंरक्षक महेश चोपडे, राजुराचे उपविभागीय जलसंधारण अधिकारी पोहन बल्की, मूलचे तालुका कृषी अधिकारी प्रशांत कसराळे तसेच दूरदृष्टी प्रणालीद्वारे संबंधित तालुक्याचे उपविभागीय अधिकारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी विनय गौडा म्हणाले, संबधित उपविभागीय अधिकाऱ्यांनी तालुकास्तरावर आराखडे तपासावे, काही फेरबदल असल्यास सुधारीत आराखडे मंजुरीसाठी पाठवावेत. अतिंम आराखडा करतांना नियतव्यय बघून तसेच प्रत्येक विभागाच्या समन्वयातुन नियोजनबद्ध पदधतीने तयार करावा. तालुकानिहाय प्रत्येक कामांची यादी तयार करावी. पुर्णत्वास आलेली तसेच प्रगतीपथावर असलेल्या कामांची सद्यस्थिती तपासून सदर कामे पोर्टलवर अपडेट करावीत.

तसेच प्रत्येक गावाचा आराखडा गटविकास अधिकाऱ्यांच्या मदतीने ग्रामसभेत ठेवून मंजूर करून घ्यावा. उपविभागीय अधिकाऱ्यांनी प्रत्येक विभागाशी समन्वय ठेवून आराखडा तयार करावा तसेच तालुकास्तरावर नियमित बैठका घेऊन सदर आराखडा सदस्य सचिवाच्या स्वाक्षरीने जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्याकडे पाठवावा. त्यासोबतच, प्रशासकीय व तांत्रिक मान्यता मिळालेल्या कामांची कार्यवाही तसेच निधी वितरण तातडीने करण्याच्या सुचना संबधित यंत्रणांना दिल्या.

यावेळी जिल्हाधिकारी श्री. गौडा यांनी विभागनिहाय एकूण मंजूर व प्रगतीपथावर असलेल्या कामांची सद्यस्थिती जाणून घेतली.