महिला सशक्तीकरण अभियानातून एकाच दिवशी 38 हजार 500 लाभार्थ्यांना लाभ – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

महिला सशक्तीकरण अभियानातून एकाच दिवशी 38 हजार 500 लाभार्थ्यांना लाभ
– मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
◆ आतापर्यंत या अभियानात एकूण 10 लक्ष 260 लोकांपैकी 2 लक्ष 72 हजार महिला लाभार्थी
◆ गडचिरोली येथे मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानाचा शुभारंभ
◆ 149 कोटी 75 लक्ष रुपयांच्या 30 कामांचे ऑनलाईन भूमिपूजन

गडचिरोली, दि.09 : मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानाचा शुभारंभ गडचिरोली येथून होत आहे, महिलांच्या आयुष्यात नवीन क्रांती घडवून आणणारा हा आजचा दिवस आहे. या अभियानातून आतापर्यंत एकूण 10  लक्ष 260 लाभार्थ्यांपैकी 2 लक्ष 72 हजार महिला लाभार्थी आहेत. तर आज एकाच दिवशी जिल्ह्यातील 38 हजार 500 लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला आहे. महिलांच्या सशक्तीकरणासाठी  शासनाने गेल्या दीड वर्षात महत्त्वाचे निर्णय घेतले असून त्याची प्रभावी अंमलबजावणी सुरु आहे. यापुढच्या काळात देखील महिला भगिनींच्या सक्षमीकरणासाठी हे सरकार कटिबद्ध असल्याची ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
गडचिरोली येथे मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानाचा शुभारंभ करतांना ते बोलत होते. यावेळी मंचावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम, खासदार अशोक नेते, आमदार डॉ. देवराव होळी, कृष्णा गजबे, पोलिस उपमहानिरीक्षक संदीप पाटील, जिल्हाधिकारी संजय मीणा, मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह, जिल्हा पोलिस अधिक्षक निलोत्पल आदी उपस्थित होते.
महिलांच्या आयुष्यात नवीन क्रांती घडवून आणणारा आजचा दिवस आहे, असे सांगून मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले,  राज्य शासनाने ‘लेक लाडकी’ योजना सुरू केली असून बचत गटाच्या अर्थसहाय्यात दुप्पट वाढ केली आहे. स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतर पहिल्यांदाच गडचिरोलीमध्ये ऐवढ्या मोठ्या संख्येने महिला उपस्थित आहेत. राज्याला कर्तृत्ववान महिलांचा वारसा आहे. आज प्रत्येक क्षेत्रात महिला पुरुषांच्या एक पाऊल पुढे आहे. स्वत:च्या तब्बेतीकडे महिला दुर्लक्ष करीत असल्यामुळे राज्यात आतापर्यंत 4 कोटी महिलांची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे.
पुढे मुख्यमंत्री म्हणाले, गडचिरोली जिल्ह्यासाठी आतापर्यंत वापरण्यात येणारा मागास हा शब्द पुसून टाकला असून मुख्य प्रवाहाकडे गडचिरोली जिल्ह्याची वाटचाल सुरू आहे. आज सुरजागडच्या माध्यमातून 10 हजार स्थानिकांना रोजगार उपलब्ध झाला आहे. या उद्योगाचे विस्तारीकरण लवकरच होणार असून आणखी 10 ते 15 हजार जणांना रोजगार उपलब्ध होईल. आजच्या कार्यक्रमात लाभार्थ्यांना ट्रॅक्टर, टिलर, ड्रोजर, हार्वेस्टर तर शालेय मुलींना सायकलीचे वाटप करण्यात आले. भविष्यात गडचिरोलीतील 10 हजार शालेय मुलींना सायकलींचे वाटप करण्यात येईल.
‘शासन आपल्या दारी’ योजनेतून राज्यातील जवळपास 2 कोटी 20 लाखांपेक्षा जास्त जणांना शासनाच्या कल्याणकारी योजनांचा लाभ देण्यात आला आहे. तसेच येथे उभारण्यात आलेल्या स्कील सेंटरमधून दरवर्षी 5 हजार तरुण- तरुणींना रोजगाराभिमुख प्रशिक्षण देण्यात येईल. राज्यातील 1 कोटी महिलांना बचत गटाच्या माध्यमातून जोडण्याचा प्रयत्न असून त्यांच्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध व्हावी, तसेच ब्रँडींग, मार्केटिंग आदी बाबींकरीता जिल्हा प्रशासनाला सुचना करण्यात आल्याचेही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.
*2023 मध्ये महिला बचत गटाला 7 हजार कोटींचे कर्ज – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस*
एकूण लोकसंख्येमध्ये 50 टक्के वाटा असलेल्या महिलांचे जोपर्यंत सशक्तीकरण होत नाही, तोपर्यंत भारत विकसीत होऊ शकत नाही, ही संकल्पना घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिलांचे जीवनमान उंचाविण्यासाठी अनेक योजना सुरू केल्या आहेत. राज्य शासनही महिलांच्या विकासासाठी कटिबध्द असून प्रत्येक बचत गट सक्षम होण्यासाठी प्रयत्न करीत आहे. महिलांना कर्ज दिले तर त्याची परतफेड करण्याचे प्रमाण 100 टक्के आहे. गतवर्षी म्हणजे सन 2023 मध्ये राज्य शासनाने 7 हजार कोटी रुपयांचे कर्ज महिला बचत गटाला उपलब्ध करून दिले, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
पुढे ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिलांसाठी उज्वला गॅस कनेक्शन, हर घर जल, हर घर बिजली आदी योजना सुरू केल्या. तसेच स्टार्ट अप योजनेतून नव उद्योजकांना 25 कोटींचे कर्ज उपलब्ध करून दिले असून यापैकी महिलांना 13 कोटी रुपये कर्ज देऊन स्वत:च्या पायावर उभे केले आहे. ‘लेक लाडकी’ योजनेतून मुलीच्या जन्माचे स्वागत तसेच 18 वर्षापर्यंत राज्य शासन 1 लक्ष रुपये देणार आहे. तसेच मुलींचे मोफत शिक्षण राज्य सरकार करीत असून एस.टी.च्या तिकीट दरामध्ये महिलांना 50 टक्के सवलत आहे.
मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानाच्या माध्यमातून गडचिरोलीतील लाखो महिलांना मदत मिळत आहे. हे अभियान 365 दिवस सुरू राहणार आहे. भविष्यात गडचिराली ही देशाची स्टील सीटी होऊ शकते. येथे येणा-या कोणत्याही प्रकल्पात स्थानिकांना रोजगार देण्याची राज्य शासनाने अट ठेवली आहे. जल, जमीन, जंगल हा आदिवासींचा अधिकार असून पर्यावरणाचे रक्षण करूनच गडचिरोलीचा विकास केला जाईल. राज्यातील पुढारलेल्या जिल्ह्यात गडचिरोलीचे नाव होईल, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला.
यावेळी अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम म्हणाले, खनिकर्म उद्योगातून जिल्ह्यात रोजगार निर्मितीसाठी प्रयत्न करण्यात येत आहे. तसेच विकासकामांमधून जिल्ह्याचा कायापालट करण्यासाठी  शासन कटिबध्द आहे. यावेळी खासदार अशोक नेते यांनीसुध्दा मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हाधिकारी संजय मीणा यांनी केले. यावेळी त्यांनी जिल्ह्यातील विकास कामांची माहिती दिली.
*विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणा-या नवरत्न महिलांचा सत्कार :* विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणा-या गडचिरोली जिल्ह्यातील नवरत्न महिलांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. यात सुलोचना मडावी (पेसा अंतर्गत ग्रामसभेसाठी विशेष पुढाकार), मनिषा मडावी (फॅशन डिझायनिंग व व्यक्तिमत्व विकास), संगिता युरोजवार (कोरोनामध्ये 100 टक्के लसीकरण), सविता भोयर (रंगभुमीत योगदान), रुपाली मोहुर्ले (दारुबंदीसाठी लढा), किरण कुमावार (शिक्षण क्षेत्र), जमुना देहारी (बचतगटाची चळवळ,) पोलिस उपनिरीक्षक कल्याणी पुट्टेवार (दुर्गम भागात स्वतंत्र पोलिस स्टेशनचा प्रभार) आणि टेबु उसेंडी (शिवणकाम प्रशिक्षक) यांचा समावेश होता. याशिवाय कविता मेहक्षेत्री आणि ज्योती कुंडारकर यांना व्हीलचेअरचे वाटप करण्यात आले.
*149 कोटी 75 लक्ष रुपयांच्या 30 विकासकामांचे भूमीपूजन :* यावेळी मान्यवरांच्या हस्ते 100 मोबाईल टॉवर, प्राथमिक आरोग्य पथक (ग्यारापत्ती), मानव विकास मिशन अंतर्गत 8 एकल गोडावून,  एकल सेंटर, आदिवासी विभागाचे शाळा व वसतिगृह, तलाव सौदर्यींकरण, नगर परिषद व नगर पंचायत प्रशासकीय इमारत, तालुका क्रिडांगण, वघाडा-सायगाव-शिवणी-डोंगरगाव मोठया पुलाचे बांधकाम करणे (ता. आरमोरी), चोप-तमाशीटोला ते वडसा मोठया पुलाचे बांधकाम करणे. (ता. वडसा) सानगडी-गोठणगाव-कुरखेडा-मालेवाडा-रामा-मोठया पुलाचे बांधकाम करणे (ता. धानोरा), सानगडी- गोठणगाव-कुरखेडा-मालेवाडा-रामा-ची सुधारणा करणे (ता. कुरखेडा), मौशीखांब-वडधा-शंकरपूर-कोरेगाव रस्ता ची रुंदीकरणासह सुधारणा करणे. (ता. वडसा),  मोशीखांब-वडधा-शंकरपूर-कोरेगाव रस्ता सुधारणा करणे कुरखेडा-वैरागड रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण करणे. (ता. आरमोरी),  मार्कण्डा देवस्थान नुतनीकरण, चपराळा देवस्थान अशा एकूण 149 कोटी 75 लक्ष रुपयांच्या 30 कामांचे भूमिपूजन करण्यात आले.
*लाभार्थ्यांना धनादेश वाटप* : अझिमा अब्दुल अझीझ पंजवानी, क्रीतिका खोबागडे, मनिषा भोयर, रत्नमाला बावणे, गीता वाघाडे, पल्लवी कोसरे, वर्षा चौधरी, किर्ती भुरसे, पायल झंझाळ, माधुरी देवगिरकर, कल्पना म्हशाखेत्री, कनक नैताम, सृष्टी खोब्रागडे, वैशाली खोब्रागडे, जानव्ही मेहेरे, रागिणी मेहेरे, डॉली महानंदे यांच्यासह बेरोजगार अंध समितीचे संध्या दादगाये, शुभांगी गेडाम, वर्षा दुर्गे व इतर लाभार्थ्यांना विविध योजनांच्या आर्थिक मदतीचे धनादेश वाटप करण्यात आले.
*पारंपरिक पध्दतीने स्वागत* : यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पारंपरिक आदिवासी टोप घालून तसेच रेला नृत्याने स्वागत करण्यात आले. तत्पुर्वी मान्यवरांच्या हस्ते मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानच्या थीम साँगचे उद्घाटन करण्यात आले.