प्रधानमंत्री मातृ वंदना योजना विशेष मोहीम 18 ते 22 डिसेंबर दरम्यान

प्रधानमंत्री मातृ वंदना योजना विशेष मोहीम 18 ते 22 डिसेंबर दरम्यान

भंडारा दि. 15 : भारतातील दारिद्र्य रेषेखालील व दारिद्र्य रेषेवरील अनेक गर्भवती महिलांना गरोदरपणात शेवटच्या टप्यापर्यंत मजुरीसाठी काम करावे लागते. तसेच प्रसूतीनंतर शारिरीक क्षमता नसतानाही मजुरीसाठी तात्काळ काम करावे लागते. यामुळे अश्या गर्भवती महिला व माता कुपोषित राहून त्याचे व त्याच्या नवजात बालकाच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. यामुळे देशाच्या मातामूत्यु व बालमूत्यु दरात वाढ होते. या कारणामुळे मातामूत्यु व बालमूत्यु कमी करण्यासाठी आरोग्य विभागामार्फत केंद्रशासनाच्या प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेला चांगला प्रतिसाद मिळत आहे.

यामध्ये पहिल्या जीवित अपत्या (मुलगा/मुलगी) करिता रुपये 5000/- चा लाभ लाभार्थीला दोन टप्प्यात (प्रथम टप्पा रुपये 3000/- गर्भवती स्त्रीची शासकीय आरोग्य संस्थेत नोंदणी शेवटच्या मासिक पाळीच्या तारखेपासून 6 महिन्याच्या आत किमान एक प्रसूतीपूर्व तपासणी केल्यानंतर व दुसरा टप्पा रुपये 2000/- लाभार्थीचे जीवित अपत्याला प्रथम चक्र लसीकरण पूर्ण केल्यानंतर दिला जातो.) यामध्ये दुसरे जीवित अपत्ये फक्त मुली करिता (जुळे/तिळे जीवित अपत्ये यामधील फक्त एकाच मुलीकरिता) एकाच टप्प्यात रुपये 6000/- चा लाभ लाभार्थीला दिला जात आहे. मात्र याकरिता बाळाचे जन्म 1 एप्रिल 2022 नंतरचे असायला पाहिजे.

या योजनेचा लाभ घेण्याकरिता पात्रता

१) लाभार्थीचे कौटुंबिक उत्पन्न प्रतिवर्ष रुपये 8 लाखापेक्षा कमी पाहिजे.

२) अनुसूचित जाती/जमातीच्या महिला.

३) दरिद्री रेषेखालील शिधापत्रिका धारक महिला.

४) ई-श्रम कार्ड धारक महिला.

५) मनरेगा जॉब कार्ड धारक महिला.

६) दिव्यांग महिला 40% किंवा पूर्ण दिव्यांग.

७) किसान सन्मान निधी महिला शेतकरी.

८) अन्न सुरक्षा कायद्या 2013 अंतर्गत शिधापत्रिका धारक महिला.

९) प्रधाम मंत्री जन आरोग्य योजना कार्ड धारक महिला.

            या योजनेचा लाभ घेण्याकरिता आपल्या जवळच्या आशा कार्यकर्ती / अंगणवाडी सेविका तसेच आरोग्य सेविका यांच्याशी संपर्क करून आपले प्रधानमंत्री मातृवंदना योजने अंतर्गत online form भरून नोंदणी करावी. जिल्ह्यातील सर्व पात्र गरोदर माता प्रधानमंत्री मातृवंदना योजनेपासून वंचित राहू नये. यासाठी सर्व आरोग्य यंत्रणा प्रयत्नशील राहतील असे, आवाहन जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी समीर कुर्तकोटी यांनी केले आहे.