राष्ट्रीय लोकअदालतीत 2 हजार 679 प्रकरणे निकाली

राष्ट्रीय लोकअदालतीत 2 हजार 679 प्रकरणे निकाली

            चंद्रपूर,  दि. 9 :  राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण सर्वोच्च न्यायालय, नवी दिल्ली आणि महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण उच्च न्यायालय, मुंबई यांच्या निर्देशानुसार प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्या अध्यक्षा समृद्धी एस. भीष्म यांच्या मार्गदर्शनात (आज दि. 9 डिसेंबर) चंद्रपूर जिल्हा न्यायालय तसेच  सर्व तालुक्यातील न्यायालयांमध्ये राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते.

या लोकन्यायालयाचे उद्घाटन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्या अध्यक्षा समृद्धी भीष्म यांच्या हस्ते पार पडले. यावेळी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव सुमित जोशी, जिल्हा न्यायाधीश अभिश्री देव, गिरीश भालचंद्र, पांडुरंग भोसले, भगवान फड, प्रशांत काळे आदी उपस्थित होते.

लोक न्यायालयासाठी चंद्रपूर मुख्यालयात 7 तसेच तालुका न्यायालयात 21 असे एकूण 28 पॅनल तयार करण्यात आले होते. या लोक न्यायालयामध्ये 10 हजार 55 प्रलंबित न्यायालयीन प्रकरणे व 17 हजार 680 दाखलपूर्व प्रकरणे अशी एकूण 27 हजार 735 प्रकरणे ठेवण्यात आली होती. त्यापैकी 1 हजार 342 प्रलंबित न्यायालयीन प्रकरणे तर 1 हजार 337 दाखलपूर्व प्रकरणे अशी एकूण 2 हजार 679 प्रकरणी निकाली काढण्यात आली. प्रलंबित प्रकरणांमध्ये मोटार वाहन अपघात नुकसान भरपाईत 9 प्रकरणे निकाली काढण्यात आली असून नुकसान भरपाई रक्कम 70 लक्ष 80 हजार वसूल करण्यात आले. भूसंपादनाची एकूण 14 प्रकरणे निकाली काढण्यात आली असून त्याबाबत 71 लक्ष 65 हजार 857 रुपये नुकसान भरपाई संबंधित पक्षकारास अदा करण्यात आली. कौटुंबिक वाद प्रकरणांपैकी 5 प्रकरणांमध्ये पक्षकारांनी तडजोडीअंती एकत्र राहण्याचा समजुतीने निर्णय घेतला.

धनादेश अनादरीत प्रकरणांपैकी 61 प्रकरणे ज्याची रक्कम रुपये 53 लाख 58 हजार 819 निकाली काढण्यात आली. लवाद वसुलीची 27 प्रकरणे निकाली काढण्यात आली ज्याची रक्कम रुपये 1 कोटी 38 लक्ष 79 हजार 192 वसूल करण्यात आली. औद्योगिक न्यायालयातील पाच प्रकरणे निकाली काढण्यात आली. जिल्ह्यातील सर्व न्यायालयात लोक अदालत यशस्वी होण्यासाठी सर्व न्यायाधीश, वकील, न्यायालयीन कर्मचारी तसेच पोलीस कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले, असे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव सुमित जोशी यांनी कळविले आहे.