निवड झालेल्या लाभार्थ्यांना कागदपत्रे अपलोड करण्याचे आवाहन

निवड झालेल्या लाभार्थ्यांना कागदपत्रे अपलोड करण्याचे आवाहन

Ø एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान व राष्ट्रीय कृषी विकास योजना

चंद्रपूर, दि.28: जिल्ह्यात फलोत्पादन,भाजीपाला पिकांचे क्षेत्र व उत्पादन वाढविण्याकरीता एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान व राष्ट्रीय कृषी विकास योजना राबविण्यात येत आहे. फलोत्पादन पिकाचा संशोधन तंत्रज्ञान, प्रसार, काढणीत्तोर तंत्रज्ञान, प्रक्रिया व पणन सुविधा यांच्या माध्यमातून समूह पद्धतीने सर्वांगीण विकास करणे, शेतकऱ्यांचे आर्थिक राहणीमान उंचावणे, पारंपारिक उत्पादन पद्धतीची व आधुनिक शास्त्रीय ज्ञानाची सांगड घालून तंत्रज्ञानाचा विकास, प्रसार व प्रचार करणे आदी या योजनेचे उद्दिष्ट आहे.

एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान अंतर्गत 14व्या लॉटरी सायकलमध्ये महाडीबीटी प्रणालीवर मोठ्या संख्येने लाभार्थ्यांची निवड झाली आहे. नव्याने निवड झालेल्या लाभार्थ्यांनी नजीकच्या सीएससी सेंटर तसेच संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील क्षेत्रीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रत्यक्ष संपर्क साधून आवश्यक कागदपत्रे तात्काळ अपलोड करून घ्यावीत. या योजनेअंतर्गत सर्वसाधारण, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती प्रवर्गातील एकूण 890 शेतकऱ्यांचे विविध घटकाकरीता निवड झालेली आहे. यात प्रामुख्याने क्षेत्र विस्तार व पुनरुज्जीवन, पॅकहाऊस, शेडनेट हाऊस, प्लास्टिक मल्चिंग आणि कांदा चाळ आदीकरीता मोठ्या संख्येने लाभार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. तरी, नव्याने निवड झालेल्या लाभार्थ्यांनी आपली आवश्यक कागदपत्रे अपलोड करावीत, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार यांनी केले आहे.