शेतकरी आत्महत्येची 20 प्रकरणे मदतीकरीता निकाली…

शेतकरी आत्महत्येची 20 प्रकरणे मदतीकरीता निकाली

Ø  अपर जिल्हाधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी घेतला आढावा

चंद्रपूर, दि. 25: जिल्हास्तरीय शेतकरी आत्महत्या प्रकरणे तपासणी समितीच्या बैठकीमध्ये शेतकरी आत्महत्येच्या एकूण 29 प्रकरणांचा आढावा घेण्यात आला. अपर जिल्हाधिकारी श्रीकांत देशपांडे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या या बैठकीत 20 प्रकरणे मदतीसाठी पात्र ठरली असून 8 प्रकरणे समितीने अपात्र ठरविली आहे, तर उर्वरित एक प्रकरण फेरतपासणी साठी प्रलंबित ठेवण्यात आले आहे.

आढावा बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी संजय पवार, कृषी उपसंचालक चंद्रकात ठाकरे, नायब तहसीलदार(सामान्य) गिता उत्तरवार, महसूल सहाय्यक प्रमोद गेडाम, जिल्हा अग्रणी बँकेचे तसेच जिल्हा मध्यवर्ती बँकेचे प्रतिनिधी आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

शेतीमध्ये सततची नापिकी, कर्जबाजारीपणा व कर्ज परतफेडीचा तगादा या तीन प्रमुख कारणांपैकी शेतकरी आत्महत्या झाली असल्यास संबंधित कुटुंबाला आर्थिक मदत देण्यात येते. जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीत शेतकरी आत्महत्येच्या 29  प्रकरणांवर चर्चा झाली. यापैकी 20 प्रकरणे पात्र करून मदतीकरीता निकाली काढण्यात आली तर 8 प्रकरणे समितीने अपात्र ठरविली. तर उर्वरित एक प्रकरण समितीने फेरतपासणी साठी प्रलंबित ठेवले आहे.