गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील वाहतूक व्यवस्थेत बदल,पोलीस प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन

गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील वाहतूक व्यवस्थेत बदल

पोलीस प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन

चंद्रपूर,दि. 23: शहरात सार्वजनिक गणेशोत्सव विसर्जनाचा कार्यक्रम दि. 28 सप्टेंबर 2023 रोजी पार पडणार आहे. त्या पार्श्वभूमीवर शहरातील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात येत आहे.

मुंबई पोलीस अधिनियम-1951 च्या कलम 33 (1)(ब) नुसार सार्वजनिक ठिकाणाची रहदारी व सुव्यवस्था राखण्यासाठी व करावयाच्या नियमनासाठी शहरामध्ये सार्वजनिक गणेशोत्सव विसर्जनाच्या कार्यक्रमाच्या रहदारीला अडथळा होऊन जनतेला त्रास होवू नये, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये म्हणुन चंद्रपूर शहरातील मुख्य मिरवणुकीचा मार्ग दि. 28 सप्टेंबर रोजी सकाळी 6 वाजेपासुन ते दि. 29 सप्टेंबर रोजीचे पहाटे 6 वाजेपर्यंतच्या कालावधीसाठी सर्व प्रकारच्या वाहनांची रहदारी वळविण्यात येत आहे, असे पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांनी कळविले आहे.

गणेश विसर्जन मुख्य मिरवणुक सोहळा पार पडेपर्यंत प्रियदर्शनी चौक ते जटपुरा गेट-कस्तुरबा चौक मार्गे गांधी चौक ते जटपुरा गेट मार्गे, रामनगर रोड मार्गे संत केवलराम चौक-इरई नदी (दाताळा पुल) हा रस्ता सर्व प्रकारच्या वाहनांना बंद करण्यात येत आहे.  नागपूर रोडने येऊन बल्लारशा किंवा मुलकडे जाणारी सर्व प्रकारची वाहने ही प्रियदर्शनी चौकाकडे जाण्यास बंदी करून सर्व प्रकारची वाहने ही वरोरा नाका उड्डानपूल-सावरकर चौक ते बंगाली कॅम्प, मुल किंवा बल्लारशाकडे जातील.

मुल किंवा बल्लारशाकडुन नागपूरकडे जाणारी सर्व प्रकारची वाहने ही बंगाली कॅम्प -सावरकर चौक, वरोरा नाका नवीन उड्डाणपुल मार्गे नागपूरकडे जातील. नागपूरकडुन शहरामध्ये जाणारी सर्व वाहने (जड वाहने वगळून) छोटा नागपुर मार्गे दाताळा चौक-देवाळा गांव-चोराळा टी पॉइंटवरून बिनबा गेट किंवा पठाणपुरा गेट मधुन शहरात प्रवेश करतील. चंद्रपुर शहर पोलीस स्टेशन हद्दीतील रहीवाशांनी नागपुर, वणी, घुग्घुस व गडचांदुरकडे जाण्याकरीता रहमत नगर, नगीनाबाग व इतर परीसरातुन जाण्यासाठी बिनबा गेट-चोराळा-दाताळा आदी मार्गाचा अवलंब करावा.  बल्लारशा व मुलकडुन येणा-या सर्व वाहनांना (जड वाहने वगळून) शहरामध्ये जायचे असल्यास बसस्टँड-एलआयसी ऑफीस- बगड खिडकी मार्गे किंवा जुनोना चौकातुन शहरामध्ये किंवा प्रसन्ना पेट्रोल पॅम्पकडुन बाबुपेठ मार्गे शहरात फक्त अंचलेश्वर गेटपर्यंत प्रवेश करता येईल.

या ठिकाणी असेल नो पार्किंग व ‘नो हॉकर्स झोन’:

गणेश विसर्जन मुख्य मिरवणुक सोहळ्यादरम्यान “नो पार्किंग झोन” व ‘नो हॉकर्स झोन’ करण्यात आले आहे.

यामध्ये, जटपुरा गेट ते कस्तुरबा चौकपर्यंत, जटपुरा गेट ते रामनगर रोड मार्गे दाताळा पुलपर्यंत, जटपुरा गेट ते प्रियदर्शनी चौकपर्यंत, कस्तुरबा चौक ते गांधी चौक ते जटपुरा गेटपर्यंत, कस्तुरबा चौक ते अंचलेश्वर गेटपर्यंत, गांधी चौक ते मिलन चौक ते जोड़ देऊळपर्यंत, कस्तुरबा चौक ते जेल रोड चौक पर्यंत, दस्तगीर चौक ते मिलन चौक,  मिलन चौक ते बजाज पॉलीटेक्नीक कॉलेज, पोटदुखे यांच्या घरापासुन ते श्री टॉकीज पर्यंत, हिंदी सिटी हायस्कुल ते रघुवंशी कॉम्प्लेक्सपर्यंत, मौलाना आझाद चौक ते जयंत टॉकीजपर्यंत, छोटा बाजार चौक ते पाताळेश्वर मंदीरपर्यंत “नो पार्किंग झोन” व ‘नो हॉकर्स झोन’ घोषित करण्यात आल्याने मिरवणुक व वाहतुक मार्गावर नागरीकांनी, व्यवसायिकांनी तसेच गणेश विसर्जन भक्तांनी कोणत्याही प्रकारची वाहने पार्किंग किंवा उभी करू नये.

मुख्य मिरवणुक मार्गावर राहणाऱ्या रहीवाशांना स्वतःच्या पार्कीगकरीता जागा नसल्यास त्यांना आपली वाहने जुबली हायस्कुलचे पटांगण, महानगरपालीकेच्या बाजुला असलेली पार्किंग या ठिकाणी उभी करता येतील. परंतु मिरवणुक संपल्यानंतरच ती वाहने तेथुन काढता येतील. त्याचप्रमाणे, चंद्रपुर शहरात मोठ्या प्रमाणात साजरा होणारा गणपती विसर्जन सोहळा पाहण्यासाठी शहरातील व इतर ग्रामीण भागातून नागरीक येत असतात. दरम्यान शहरात वाहतुक कोंडी होवु नये म्हणुन नागरीकांना पार्किंग झोन उपलब्ध करुन देण्यात येत आहेत.

चंद्रपूर शहरातील व इतर ग्रामीण भागातून येणाऱ्या नागरीकांसाठी उपलब्ध पार्किंग झोन :

चांदा क्लब ग्राउंड, डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉलेज, वरोरा नाका, सेंट मायकल हायस्कुल, नगीनाबाग सिंधी पंचायत भवन, संत केवलराम चौकजवळ रामनगर, व्यायाम शाळा ग्राउंड, पठानपुरा चौक, डी. एड. कॉलेज ग्राउंड बाबुपेठ, महाकाली मंदीर ग्राउंड, चंद्रपुर ही ठिकाणे दि. 28 सप्टेंबर 2023 चे सकाळी 6 वाजेपासुन ते दि. 29 सप्टेंबरचे सकाळी 6 वाजेपर्यंत नागरीकांसाठी पार्किंग स्थळे म्हणुन घोषीत करण्यात येत आहेत. नागरीकांनी आपली वाहने शहरात न आणता दिलेल्या पार्किंग स्थळी पार्क करावीत. जनतेने विसर्जनादरम्यान वाहतूक व्यवस्थेचे पालन करून शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्याकरिता पोलीस प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांनी केले आहे.