‘सूरजागड’तून होणाऱ्या वाहतुकीवर आळा घाला आमदार सुधाकर अडबाले

‘सूरजागड’तून होणाऱ्या वाहतुकीवर आळा घाला
आमदार सुधाकर अडबाले यांच्या प्रश्नावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे उत्तर

गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील सुरजागड येथील खाणीतून लोह खनिजाची वाहतूक करणाऱ्या वाहनांमुळे मागील काही महिन्यांत चंद्रपूर, गडचिरोली या दोन जिल्ह्यात अपघाताच्या घटनांत वाढ झाली आहे. या अपघातात अनेकांसह एका शिक्षक कर्मचाऱ्यानेसुद्धा जिव गमावला होता. सुरजागड खाणीतून होणाऱ्या वाहतुकीवर आळा घालण्यासाठी हा गंभीर प्रश्न आमदार सुधाकर अडबाले यांनी तारांकीत प्रश्‍नाच्या माध्यमातून उपस्‍थित केला. त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, परिवहन विभागामार्फत गडचिरोली जिल्ह्यातील अपघात कमी करण्यासाठी एकात्मिक वाहतूक व्यवस्थापन प्रणाली बसविण्याबाबतच्या सूचना परिवहन आयुक्त यांनी दिल्या असल्याचे सांगितले.

गडचिरोली जिल्ह्यातील हा गंभीर प्रश्न आमदार सुधाकर अडबाले यांनी पावसाळी अधिवेशनात तारांकीत प्रश्‍नाच्या माध्यमातून उपस्थित केला होता. गडचिरोली जिल्ह्यामध्ये सुरू असलेल्या विविध राष्ट्रीय महामार्गाच्या कामासंदर्भात जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने यासंदर्भात नोटीस बजावली आहे. अपघाताच्या घटना रोखण्यासाठी ठराविक अंतरावर चेक पोस्ट तयार करण्यात आले आहेत. वाहनांची नियमित तपासणी केली जात आहे. वाहतुकीच्या मार्गावर दिशादर्शक फलक, वेगमर्यादेचे फलक, स्पीड ब्रेकर बसविण्यात आले आहेत. पोलिस विभागातर्फे नाकाबंदी करून वाहनांची तपासणी केली जात आहे. अपघात झाल्यास मदतीकरिता रुग्णवाहिका तैनात करण्यात आल्या आहेत. कंत्राटदार कंपनीकडून लोहखनिज वाहतुकीच्या मार्गावर सुरक्षा गार्ड तैनात करण्यात आले आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत गडचिरोली जिल्ह्यामध्ये विविध ठिकाणी रस्ता नूतनीकरणाची, उन्नतीकरणाची व मजबुतीकरणाची तसेच काही कामांची निविदा प्रक्रियेची कामे सुरू असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तरात दिली.