हत्ती-बेडकांच्या तुलनेऐवजी जनतेसाठी सत्कर्म करा-हेमंत पाटील

हत्ती-बेडकांच्या तुलनेऐवजी जनतेसाठी सत्कर्म करा-हेमंत पाटील

मुंबई, १७ जून २०२३

 

बेडूक कोण आणि हत्ती कोण? या वादात पडण्यापेक्षा सत्ताधारी पक्षातील नेत्यांनी शेतकऱ्यांसह महागाईने होरपळलेल्या सर्वसामान्यांना दिलासा द्यावा. तळागाळात जावून लोकांची रखडलेली कामे पुर्णत्वास घेवून जावे,असे आवाहन इंडिया अगेन्स्ट करप्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत पाटील यांनी शनिवारी केले. शिंदे-फडणवीस सरकार सत्तेवर येवून वर्ष लोटले आहे. या सरकारकडून सर्वसामान्यांना दिलासा मिळेल अशी अपेक्षा होती.पंरतु,यात सरकारला फार काही यश आलेले नाही असेच म्हणावे लागेल. दरम्यान, शासन आपल्या दारी या उपक्रमामुळे थेट सरकारच जिल्ह्याजिल्ह्यात, घरोघरी पोहचल्याने थोडाफार दिलासा सर्वसामान्यांना मिळतोय, हे नाकारता येणार नाही.

 

पंरतु,अर्थसंकल्पात सरकारने केलेल्या घोषणांची,शेतकऱ्यांसाठीच्या ‘महा सन्मान निधी’ योजनेची तत्काळ अंमलबजावणी होणे आवश्यक आहे,असे प्रतिपादन पाटील यांनी केले.महाविकास आघाडी विरोधात एक चांगली युती जनतेला मिळाली आहे.एकनाथ शिंदे यांचा कामांचा धडाका आणि देवेंद्र फडणवीस यांची प्रशासनावरील घट्ट पकड या सरकारची जमेची बाजू आहे.तुर्त विरोधकांना कुठलीही संधी या सरकारने आतापर्यंत दिलेली नाही.

 

पंरतु, शिंदे समर्थकांकडून करण्यात आलेल्या जाहिरातबाजीमुळे फडणवणीस आणि भाजप नेते दुखावले गेले आहे.युतीत खडा टाकण्याचे काम केले जात असले तरी, शिंदे-फडणवीसांनी एकमेकांवर विश्वास ठेवत सर्वसामान्यांचे कामे मार्गी लावली पाहिजे, असे आवाहन यानिमित्ताने पाटील यांनी केले आहे. शेतकऱ्यांच्या पिकाला योग्य हमीभाव मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.दुसर्या राज्यातील सरकार महाराष्ट्रात येवून चढ्या भावाने शेतकऱ्यांचा शेतमाल खरेदी करीत आहे. अशात राज्य सरकारवरील शेतकऱ्यांच्या मनात असलेला विश्वास कमी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.शिंदे-फडणवीस सरकारने याअनुषंगाने पावले उचलत शेतमालाला योग्य हमी भाव देण्यासाठी प्राधान्याने प्रयत्न करावे असे आवाहन पाटील यांनी केले.