ई-केवायसी पूर्ण झालेली नसल्यास मिळणार नाही 14 वा हप्ता

पी.एम. किसान सन्मान निधी : चेहरा प्रमाणीकरणाच्या माध्यमातून पूर्ण करा ई-केवायसी

Ø ई-केवायसी पूर्ण झालेली नसल्यास मिळणार नाही 14 वा हप्ता

 

चंद्रपूर, दि. 11 : देशातील अल्पभुधारक शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न मिळण्याकरीता केंद्र शासनाने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना 1 डिसेंबर 2018 पासून सुरू केलेली आहे. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपये आर्थिक मदत म्हणून देण्यात येत आहे. पात्र शेतकऱ्यांना दर चार महिन्यांच्या अंतराने प्रत्येकी दोन हजार रुपयांची मदत केली जात असून आतापर्यंत सदर योजनेच्या 13 हप्त्यांचे प्रदान करण्यात आले आहे.

 

तसेच सदर योजनेच्या 14 व्या हप्त्याचे वितरण माहे जुन 2023 मध्ये करण्यात येणार आहे. मात्र ई-केवायसी पूर्ण झाली नसल्यास संबंधित लाभार्थी शेतक-याला 14 व्या हप्त्यापासून वंचित राहावे लागू शकते. त्यामुळे त्वरीत ई-केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे चेहरा प्रमाणीकरणाच्या माध्यमातून आता ई-केवायसी करता येणार आहे.

 

केंद्र शासनाच्या धर्तीवर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी अतिरीक्त लाभ म्हणून ‘नमो शेतकरी महासन्मान निधी’ योजना सुरू करण्यास कॅबीनेट मध्ये मंजूरी मिळाली आहे. पी.एम. किसान निधी मधील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर महाराष्ट्र शासनातर्फे वर्षाला अतिरीक्त सहा हजार रुपये जमा करण्यात येईल. त्यामूळे महाराष्ट्रातील पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात केंद्र शासनातर्फे वार्षिक सहा हजार व राज्य शासनातर्फे वार्षिक सहा असे एकंदरीत वर्षाला 12 हजार रुपयांची आर्थिक मदत जमा केली जाणार आहे.

 

पीएम किसान सन्मान निधी योजनेची रक्कम मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी ई-केवायसी व बँक खात्याला आधार जोडणी पूर्ण केली असणे आवश्यक आहे. ई-केवायसी तथा बँक खात्याला आधार जोडणी प्रक्रिया पूर्ण न झाल्यास शेतकऱ्यांना केंद्र शासनाच्या पी.एम. किसान सन्मान निधीचा 14 हप्ता व पुढील हप्ते तसेच राज्य शासनाच्या नमो शेतकरी महासन्मान निधी या दोन्ही योजनांचा लाभ मिळणार नाही. त्यामूळे ज्या शेतकऱ्यांना आजतागायत 13 हप्ते प्राप्त झालेले आहे, परंतू, ई-केवासी अद्याप केलेली नाही त्यांना पुढील हप्त्यांचा लाभ मिळणार नाही.

 

जिल्ह्यात सध्या एकंदरीत 33309 शेतकऱ्यांचे ई-केवायसी करणे प्रलंबित असून त्यापैकी बल्लारपूर (555), भद्रावती (2012), ब्रम्हपूरी (3430), चंद्रपूर (822), चिमूर (5973), गोंडपिपरी (1306), जिवती (1236), कोरपना (1693), मूल (2634), नागभीड (2698), पोंभूर्णा (1251), राजूरा (2098), सावली (2591), सिंदेवाही (2114) आणि वरोरा (3009) शेतकऱ्यांचे ई-केवायसी करणे प्रलंबित आहेत.

 

कशी करावी ई-केवायसी : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेतील ई-केवायसी झालेली नसलेल्या शेतकऱ्यांची यादी गावातील कृषी सहाय्यक यांचेकडे तथा ग्रामपंचायत स्तरावर उपलब्ध असून सदर योजनेच्या लाभार्थ्यांनी ई-केवायसी झाली नसल्यास कृषी विभागाचे कर्मचाऱ्यांशी संपर्क साधावा. तसेच, आपले नोंदणीची स्थिती जाणून घेणेकरीता पुढील प्रणालींचा वापर करावा. पी. एम. किसान पोर्टलवरील Farmers Corner मधील e-KYC OTP आधारीत सुविधेद्वारे KYC प्रमाणीकरण करून घ्यावे किंवा नजीकच्या सामाईक सुविधा केंद्रामार्फत (CSC) किंवा केंद्र शासनाच्या PMKISAN Gol ॲप द्वारे.

 

PMKISAN Gol अॅप वापरण्याची कार्यपद्धती : केंद्र शासनाने अँड्रॉईड मोबाईलवर फेस ऑथेंटिकेशन (Face Authentication) अॅपद्वारे पीएम किसान सन्मान योजनेच्या लाभार्थ्यांना ई केवायसी (e-KYC) प्रमाणिकरण करण्यासाठी नवीन सुविधा उपलब्ध करून दिली आहे. या सुविधेच्या माध्यमातून लाभार्थ्यांना स्वतःचे तसेच इतर लाभार्थ्यांचे सुद्धा ई-केवायसी करता सहजतेने पूर्ण येणार आहे.

 

अशी आहे प्रक्रिया : 1. सर्वप्रथम Google Play Store वरून ‘PMKISAN Gol’ हे App डाउनलोड करून घ्यावे. तत्पूर्वी जुने Pm Kisan App असल्यास त्यास डिलिट करून पुन्हा PMkisan App २.०.० हे अॅप्लिकेशन Install करावे. त्यानंतर येणाऱ्या स्क्रीनवर इंग्रजी व हिंदी यापैकी एक भाषा निवडा. 2. स्क्रिनवर New Farmer Registration आणि Login यापैकी ‘पीएम किसान’ योजनेतील नोंदणीकृत लाभार्थ्यांनी Login या बटणावर क्लिक करावे. अॅप वापरासाठी शेतकऱ्यांकडे त्यांचा पी. एम. किसान Registration Id किंवा आधार क्रमांक तसेच आधार क्रमांकाला जोडलेला मोबाईल क्रमांक चालु स्थितीत असणे आवश्यक आहे. 3. स्क्रीनवरील Login Type मधील Beneficiary पर्याय निवडून पीएम किसान Registration Id किंवा आधार क्रमांकाद्वारे Login करण्यासाठी GET OTP बटनावर योजनेसाठी रजिस्टर केलेल्या मोबाईलवर आलेला चार अंकी OTP टाकून Login करावे. त्यानंतर पुढील स्क्रीनवर स्वतःचा सहा अंकी MPIN तयार करावा. MPIN च्या माध्यमातून लाभार्थ्यास App मध्ये Login करणे व e-KYC करणे सोयीचे होईल. 4. ज्या Registration Id किंवा आधार क्रमांकावरून Login केले, त्या लाभार्थ्यांचे ई-केवायसी प्रमाणिकरण प्रलंबित असल्यास “Your e-KYC is pending for completion” असा संदेश दिसेल. त्यानंतर Click here to complete your e-KYC यावर क्लिक केल्यावर लाभार्थ्यांनी तयार केलेला सहा अंकी MPIN तेथे टाकावा. त्यानंतर Consent Form वर क्लिक करून Scan Face वर त्यानंतर समोर FaceRD App is not installed on device असा संदेश येईल आणि त्यावर Ok म्हणा. त्यानंतर गुगल प्ले स्टोअर Aadhar FaceRd (Early Access) हे App Install करण्यासाठी उपलब्ध होईल.

 

ते Install करा. त्यानंतर मोबाईलमध्ये Capturing Face सुरू होईल. त्यावेळी आलेल्या सूचनांचे पालन करून Proceed या बटणावर क्लिक करावे. 5. मोबाईल समोर धरून चेहऱ्यावर प्रकाश दिसेल, अशा पद्धतीने Scan Face या बटणावर. त्यानंतर Images captured successfully processing असा संदेश स्क्रिनवर आल्यानंतर Successful e- KYC असा संदेश दिसेल. म्हणजेच लाभार्थ्याचे e-KYC प्रमाणीकरण पूर्ण झाले. इतर लाभार्थीचे e- KYC करण्यासाठी Dashboard वरील e-KYC for other beneficiaries’ या बटणावर क्लिक करून

 

वरीलप्रमाणे प्रक्रिया पूर्ण केल्यास आपली प्रक्रिया पूर्ण होईल.

 

ई-केवायसी पूर्ण झालेली नसल्यास मिळणार नाही 14वा हप्ता. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या 14 व्या हप्त्याचा व नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा लाभ मिळविण्यासाठी जवळचे ग्राहक सेवा केंद्र किंवा कृषी विभागाचे कर्मचारी यांच्याशी संपर्क साधून किंवा PMKISAN Gol या अॅप च्या माध्यमातून ई-केवायसी ची प्रक्रीया तातडीने पूर्ण करून घेण्याबाबत चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आवाहन केले आहे.