शेतकरी आत्महत्येची नऊ पैकी आठ प्रकरणे मदतीकरीता पात्र

शेतकरी आत्महत्येची नऊ पैकी आठ प्रकरणे मदतीकरीता पात्र

अपर जिल्हाधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी घेतला आढावा

 

चंद्रपूर, दि.01: जिल्हास्तरीय शेतकरी आत्महत्या प्रकरणे तपासणी समितीच्या बैठकीमध्ये शेतकरी आत्महत्येच्या एकूण 9 प्रकरणांचा आढावा घेण्यात आला. अपर जिल्हाधिकारी श्रीकांत देशपांडे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या या बैठकीत 8 प्रकरणे मदतीसाठी पात्र ठरली असून 1 प्रकरण समितीने अपात्र ठरविले आहे.

शेतीमध्ये सततची नापिकी, कर्जबाजारीपणा व कर्ज परतफेडीचा तगादा या तीन प्रमुख कारणांपैकी शेतकरी आत्महत्या झाली असल्यास संबंधित कुटुंबाला 23 जानेवारी 2006 च्या शासन निर्णयाद्वारे आर्थिक मदत देण्यात येते.

जिल्हाधिकारी कार्यालयातील वीस कलमी सभागृहात पार पडलेल्या या आढावा बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी विशालकुमार मेश्राम, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. महादेव चिंचोळे, नायब तहसिलदार गिता उत्तरवार, जिल्हा उपनिबंधक, जिल्हा अग्रणी बँक व चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे प्रतिनिधी, महसूल सहाय्यक प्रमोद गेडाम आदी प्रामुख्याने उपस्थित होते.