शहरात तीव्र उष्णतेची लाट (Heat Wave) नागरिकांना सतर्कतेचा इशारा

शहरात तीव्र उष्णतेची लाट (Heat Wave)

नागरिकांना सतर्कतेचा इशारा

 

चंद्रपूर २१ एप्रिल – चंद्रपूर शहरात उष्णतेची लाट सुरु असुन तापमान ४० अंश सेल्सिअसच्या पार झाले आहे व सातत्याने वाढत आहे. उष्णतेच्या लाटेचा सामना करण्यास सतर्क राहण्याचा इशारा चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे देण्यात येत आहे.

तीव्र उष्णतेच्या पार्श्वभूमीवर उष्माघात कृती आराखड्याची आढावा बैठक उपायुक्त अशोक गराटे यांच्या अध्यक्षतेखाली मनपा सभागृहात पार पडली.याप्रसंगी माहीती देतांना वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. वनिता गर्गेलवार यांनी सांगीतले की, २०२० व २१ हे कोरोना काळाचे वर्ष सोडता २०१६ पासून दर उन्हाळ्यात राबविण्यात येणाऱ्या उष्माघात कृती आराखड्याच्या यशस्वी अंमलबजावणीमुळे जिल्हा सामान्य रुग्णालय येथील ‘ शीत वार्ड ‘ येथे उष्माघाताच्या भरती रुग्णांपैकी एकाही रुग्णाचा उष्माघाताने मृत्यू आतापर्यंत झालेला नाही.

उष्माघात टाळण्यास नागरिकांनी शक्यतो दुपारी १२ ते ४ या वेळेत बाहेर पडणे टाळावे, घर थंड राहण्यास नागरीकांनी कुल रूफ टेक्नोलॉजीचा वापर करावा म्हणजेच उष्णतारोधक पेंट जर घराच्या छतावर मारले तर २ ते ३ डिग्री तापमान कमी होण्यास मदत मिळते. शहरात स्वयंसेवी संस्थां व चिल्ड वॉटर असोसिएशनतर्फे पाणपोईची व्यवस्था करण्यात आलेली आहे व त्यात अजुन भर पडेल या दृष्टीने प्रयत्न सुरु आहेत.रेल्वे प्रशासनाद्वारे स्टेशनवर ६ वाटर कुलरची व्यवस्था करण्यात आली आहे. उष्माघातामुळे निर्माण होणाऱ्या आपातकालीन परिस्थितीप्रसंगी रुग्णवाहिकेला बोलाविण्यास १०८ क्रमांकावर कॉल करावा.

बेघर आणि भिकारी यांची व्यवस्था बेघर निवाऱ्यात करण्यात येत आहे. कामगारांच्या कामाच्या वेळेत बदल करण्यासाठी कामगार आयुक्तांना मनपातर्फे पत्र देण्यात येणार आहे.काही तात्पुरते व कायमचे प्रवासी निवारे मनपा व स्वयंसेवी संस्थांद्वारे तयार करण्यात येत आहेत. स्वयंसेवी संस्था व दुकानदार यांनी आपल्या दुकानासमोर पाण्याच्या कॅन किंवा पाण्याची व्यवस्था करावी या दृष्टीने व्यापारी संघटनांना पत्र देण्यात आले आहे. ट्रॅफीक सिग्नल १२ ते ३ या कालावधीत बंद राहतील जेणेकरून उन्हात उभे राहावे लागणार नाही. मनपा क्षेत्रातील बगीचे सकाळी ९ ते रात्री ९ वाजेपर्यंत सुरु ठेवण्यात येत आहेत. शाळांच्या वेळेत बदल करून मे महिन्यात शाळा बंद राहतील या दृष्टीने प्रयत्न करण्यात येत आहेत.

याप्रसंगी सहायक आयुक्त विद्या पाटील,नरेंद्र बोभाटे,उपअभियंता विजय बोरीकर, नगररचनाकार राजू बालमवार,शाखा अभियंता रवींद्र कळंबे, डॉ. जयश्री वाडे, डॉ. विजया खेरा, डॉ. अश्विनी भारत, डॉ. अमोल शेळके, डॉ. योगेश्वरी गाडगे,डॉ. शरयु गावंडे,डॉ.आरवा लाहिरी,डॉ.शुभंकर पिदूरकर, डॉ. नरेंद्र जनबंधू,आयएमए अध्यक्ष डॉ.कीर्ती साने,डॉ. यामिनी पंत,ऑटोरिक्षा संघटनेचे प्रतिनिधी मधुकर राऊत,सुनील धंदेरे,अनिल मिसाळ उपस्थीत होते.