महाशिवरात्रीनिमित्त आयोजित यात्रांदरम्यान गर्दी नियंत्रणासाठी भाविकांना प्रशासनाचे आवाहन

महाशिवरात्रीनिमित्त आयोजित यात्रांदरम्यान गर्दी नियंत्रणासाठी भाविकांना प्रशासनाचे आवाहन

 

गडचिरोली, दि.१६ : जिल्ह्यात विविध ठिकाणी शनिवारी दिनांक 18 फेब्रुवारी रोजी महाशिवरात्री निमित्त यात्रांचे आयोजन करण्यात आले आहे. गडचिरोली जिल्ह्यात मार्कंडा देवस्थानाबरोबरच इतरही ठिकाणी महाशिवरात्री यात्रेनिमित्त भाविकांची गर्दी होत असते. यावेळी प्रशासनाकडून पोलीस बंदोबस्तासह भाविकांसाठी योग्य सुविधा उपलब्ध होण्यासाठी प्रशासनाकडून नियोजन करण्यात आले आहे. महाशिवरात्रीनिमित्त येणाऱ्या भाविकांनी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी यात्रेदरम्यान प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे. यात्रेच्या नियोजनाबाबत जिल्हाधिकारी संजय मीणा यांनी विविध सहभागी प्रशासनाच्या नियोजन बैठका घेऊन आवश्यक सूचना दिल्या आहेत. यावर्षी प्रशासनाकडून मार्कंडा देवस्थानासह आरततोंडी कुरखेडा, डोंगरी आरमोरी, चपराळा चामोर्शी, वैरागड, पळसगाव आरमोरी, वांगेपल्ली, वेंकटापूर अहेरी व सोमनूर सिरोंचा या ठिकाणी भाविकांसाठी आवश्यक नियोजन करण्यात आले आहे. मागील दोन वर्षात कोविड साथरोगामुळे यात्रेचे आयोजन करण्यात आले नव्हते. यावर्षी जिल्ह्यातील सर्वच ठिकाणी भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणात राहण्याची शक्यता नाकारता येत नाही.

कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या अनुषंगाने जिल्हा परिषद, जिल्हा प्रशासनाचे विविध विभाग, महसूल विभाग, पोलीस विभाग यांनी ठिकठिकाणी सूचनाफलक, व्यवस्थेचे आयोजन, दिशादर्शक फलक तयार केले आहेत. यानुसार भाविकांनी दिलेल्या सूचनांचे पालनही करावे.

भाविकांच्या सुरक्षीततेच्या दृष्टीकोनातून समग्र

प्रवेश मार्ग व निर्गमन मार्ग आखून घेण्यात आले आहेत. तसेच काही ठिकाणी भाविक नदीतील बोट वापरून प्रवास करतात. यावेळी प्रवासाकरिता सुरक्षित मार्ग आखून दिले असल्यासच त्याठिकाणी प्रवास करावा. अन्यथा पाण्यातून प्रवास टाळावा.

*स्नान करताना विशेष काळजी घेण्याचे आवाहन* – यात्रेसाठी येणारे भाविक दर्शनाआधी नदीपात्रात किंवा शेजारील उपलब्ध पाण्यात स्नान करून देवदर्शन घेतात. यावेळी प्रशासनाकडून नियोजित केलेल्या ठिकाणीच स्नान करावे. लावलेल्या बॅरिगेट्स च्या बाहेर जाऊन किंवा इतरत्र स्नान करणे जीविताला धोकादायक असून भाविकांनी कुठल्याही प्रकारे सुव्यवस्था बिघडणार नाही याची काळजी घ्यावी.

*जिल्ह्यातील प्रशिक्षित 300 आपदा मित्र करणार मदत* – जिल्हा आपत्ती प्राधिकरणाद्वारे नुकतेच जिल्ह्यातील निवडक तीनशे जणांना आपत्ती व्यवस्थापनाबत बाबत प्रशिक्षित करण्यात आले आहे. जिल्ह्यात विविध ठिकाणी महाशिवरात्रीनिमित्त होणाऱ्या कार्यक्रमादरम्यान हे 300 आपदा मित्र प्रशासनाला सहकार्य करून व्यवस्थेबाबत भाविकांना मदत करणार आहेत.