श्रीलक्ष्मी कॅटरर्सला मनपाकडून ३ हजारांचा दंड

श्रीलक्ष्मी कॅटरर्सला मनपाकडून ३ हजारांचा दंड

 

चंद्रपूर ९ फेब्रुवारी – चंद्रपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने कचरा सार्वजनिक रस्त्यावर टाकल्याबद्दल श्रीलक्ष्मी कॅटरर्सला ३ हजारांचा दंड ठोठावला आहे संबंधीतांकडुन दंड वसुल करून पुन्हा सदर कृती न करण्याची ताकीद सुद्धा देण्यात आली आहे.

लग्न समारंभ, वाढदिवस, नामकरण अश्या अनेक प्रसंगी कॅटरर्सची आवश्यकता असते. या विशेष प्रसंगी मोठ्या प्रमाणात खाद्य पदार्थ बनविले जातात. वेळेवर कमी पडू नये म्हणुन आवश्यकतेपेक्षा ज्यास्तीचे अन्न सुद्धा अनेकदा बनविण्यात येते. समारंभानंतर हे अन्न काही कॅटरर्स द्वारा नदी,नाल्यात, उघड्यावर, कचऱ्यात, रस्त्याच्या कडेला काही प्रसंगी जंगल परिसरात सुद्धा गाडीने आणुन टाकले जाते. यामुळे घन कचरा व्यवस्थापनाचा प्रश्न निर्माण होतो. कॅटरर्स द्वारा घन कचऱ्याचे निवारण शास्त्रीय पद्धतीने न केल्यास अथवा घन कचरा बाहेर फेकलेला आढळल्यास दंडात्मक कारवाई करण्याचे निर्देश आयुक्त विपीन पालीवाल यांनी १० जानेवारी रोजी घेण्यात आलेल्या बैठकीत दिले होते त्यानुसार सदर कारवाई करण्यात येत आहे.

यापुर्वीही अश्या प्रकारची दंडात्मक कारवाई चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे करण्यात आली आहे व विभागामार्फत सातत्याने उपद्रवी घटकांवर नजर ठेवण्यात येत आहे. स्वच्छता विभागामार्फत दररोज सकाळ संध्याकाळ झडाई करून शहर स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न केला जातो मात्र काही उपद्रवी तत्वांद्वारे सार्वजनिक ठिकाणी कचरा फेकणे, सार्वजनिक ठिकाणी बांधकाम साहित्य ठेवणे हे प्रकार केले जातात. स्वच्छतेची सवय लावुन महानगरपालिकेच्या प्रयत्नांना योग्य तो सहयोग करण्याचे चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे करण्यात येत आहे.