रोपवाटिकेतून शेतकरी महिलेची प्रगतीची वाट Ø गत हंगामात साडेचार लक्ष रोपांची विक्री

रोपवाटिकेतून शेतकरी महिलेची प्रगतीची वाट

Ø गत हंगामात साडेचार लक्ष रोपांची विक्री

 

चंद्रपूर, दि. 9 : कोरोनाच्या परिस्थितीनंतर नागरिक स्वत:च्या आरोग्याबाबत अधिक जागरुक झाले आहेत. विशेष करून आहारात विषमुक्त खाण्याकडे नागरिकांचा कल दिसून येतो. त्यामुळे नियंत्रित वातावरणामध्ये तयार झालेला किडरोग मुक्त भाजीपाला रोपांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढत आहे. ही बाब ओळखून कोरपना तालुक्यातील निमणी येथील महिला शेतकरी माधुरी भोंगळे यांनीसुध्दा प्रगतीची वाट धरण्यासाठी रोपवाटिका योजनेचा लाभ घेतला. गत हंगामात शेतीला लागणा-या खर्चापेक्षा त्यांना दुप्पट नफा रोपवाटिकेने मिळवून दिला.

 

माधुरी भोंगळे यांच्याकडे साडेतीन एकर शेती आहे. यापूर्वी कपाशी आणि तूर ही पारंपरिक पिके घेऊन थोडाफार नफा त्यांच्या पदरी पडत असे. अशीच शेती करण्यापेक्षा काहीतरी नवीन प्रयोग करू, अशी कल्पना त्यांचे पुतणे निखील यांनी घरच्यांसमोर मांडली. शासनाच्या राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर रोपवाटिका योजनेचा आपण लाभ घेऊ शकतो, हे त्यांनी पटवून दिल्यावर माधुरी यांनी सदर योजनेकरीता अर्ज केला. योजनेसाठी इतरही शेतक-यांचे अर्ज आले होते. इश्वर चिठ्ठीनुसार माधुरी यांना शेडनेट मंजूर झाले. कृषी विभागाच्या मार्गदर्शनात त्यांनी 10 गुंठ्ठे जागेवर रोपे लावून विकसीत केली. यात मिरची, वांगे, कोबी, टमाटर, कांदे, काकडी, पत्ताकोबी आदींचा समावेश आहे.

 

विशेष म्हणजे मे – जानेवारी पर्यंत झालेल्या हंगामात त्यांच्या रोपवाटिकेतून तब्बल साडेचार लक्ष रोपांची विक्री करण्यात आली आहे. यात सर्वाधिक 4 लक्ष रोपे मिरचीची असून वांगे 20 हजार रोपे, कोबी 15 हजार रोपे व इतर रोपांचा समावेश आहे. गत हंगामात त्यांना सर्व लागत खर्च 3 लक्ष रुपये आला. रोपे विक्रीतून त्यांनी 6 लाखांचे उत्पन्न घेतले असून शेतीखर्च सोडून निव्वळ नफा 3 लक्ष रुपये मिळाल्याचे माधुरी भोंगळे यांनी सांगितले. आपल्या शेतीमध्ये शासकीय योजनेतून सौरउर्जेवर कृषीपंपसुध्दा असल्याचे त्या म्हणाल्या.

 

जिल्ह्यातील जवळपास 700 पेक्षा जास्त शेतकऱ्यांना 2021-22 आणि 2022-23 या दोन वर्षात दरवर्षी रोपवाटिकेतून मिरची, फुलकोबी, वांगी, टोमॅटो, पत्ताकोबी, कांदा इत्यादी भाजीपाला वर्गीय रोपे पुरविण्यात आली. त्यामुळे शेतकऱ्यांचा रोपे तयार करण्यासाठी लागणारा वेळ, श्रम आणि पैशाची मोठ्या प्रमाणात बचत झाली. शिवाय नामांकित कंपन्यांच्या बियाण्यापासून तयार केलेली दर्जेदार रोपे शेतकऱ्यांना उपलब्ध करून देता आल्यामुळे शेतक-यांच्या उत्पन्नात वाढ झाली आहे. या योजनेचा लाभ जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांना झाल्यामुळे कृषी विभागाची ही योजना अत्यंत उपयोगी सिद्ध झाल्याचे जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब ब-हाटे यांनी सांगितले.

 

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर रोपवाटिका योजना : राज्यातील प्रत्येक तालुक्यात दर्जेदार किडरोग मुक्त रोपे तयार करणा-या लहान रोपवाटिका उभारण्याच्या उद्देशाने शासनाने राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर रोपवाटिका योजना सुरू केली आहे. सदर योजना एकूण 4 लक्ष 60 हजार रुपयांची योजना असून 50टक्के अनुदान आहे.

 

योजनेचा उद्देश : भाजीपाला पिकांचे दर्जेदार व किडरोग मुक्त रोपे निर्मिती करून उत्पन्नात वाढ करणे. रोपवाटिकेमुळे स्थानिक शेतक-यांना शेतीपुरक व्यवसायाची संधी उपलब्ध करून देणे. पीक रचनेत बदल घडवून आणणे व नवीन तंत्रज्ञानाचा वापर करणे. शेतक-यांचे आर्थिक उत्पन्न व भाजीपाला उत्पन्नात वाढ करणे.

 

लाभार्थी निवड : अर्जदाराकडे स्वत:च्या मालकीची किमान 0.40 हेक्टर जमीन असणे आवश्यक आहे (7/12). रोपवाटिका उभारण्यासाठी कायम पाण्याची सोय असणे आवश्यक.

 

लाभार्थी निवडीचा प्राधान्यक्रम : महिला कृषी पदवीधारकांना प्रथम प्राधान्य. महिला गट / महिला शेतकरी द्वितीय प्राधान्य. भाजीपाला उत्पादक अल्प – अत्यल्प भुधारक शेतकरी व शेतकरी गट यांना तृतीय प्राधान्य राहील.

 

पात्रतेचे निकष : सदर योजनेंतर्गत रोपवाटिका पूर्णपणे नव्याने उभारायच्या आहेत. यापूर्वी शासनाचा लाभ घेतलेला खाजगी रोपवाटिकाधारक, शासनाचा लाभ न घेता उभारलेल्या खाजगी रोपवाटिकाधारक तसेच राष्ट्रीय कृषी विकास योजना, एकात्मिक उत्पादन विकास अभियान, पोकरा किंवा इतर योजनेतून संरक्षण शेती (शेडनेट व हरीतगृह) घटकाचा लाभ घेतलेले लाभार्थी पुनश्च: सदर योजनेअंतर्गत लाभास पात्र राहणार नाही.

 

योजनेची अंमलबजावणी : सदर योजनेंतर्गत इच्छुक शेतक-यांनी महाडीबीटी या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करावे. अधिक माहितीकरीता तालुका कृषी अधिका-यांसोबत संपर्क करावा.