समाजकल्याण विभागाच्या जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे उद्घाटन

विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्व गुण व सांघिक भावना वृद्धिगंत होण्यासाठी खेळ उपयुक्त – सहाय्यक आयुक्त अमोल यावलीकर

Ø समाजकल्याण विभागाच्या जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे उद्घाटन

चंद्रपूर,दि. 04: शालेय विद्यार्थ्यांच्या अंगी विविध कलांगुण असतात. त्या कलागुणांना वाव मिळावा व त्यांच्यामध्ये शिक्षणासोबतच, नेतृत्व गुण व सांघिक भावना वृद्धिगंत होण्यासाठी खेळ उपयुक्त आहे, असे प्रतिपादन समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त अमोल यावलीकर यांनी केले. सैनिक स्कूल, चंद्रपूर येथे सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण द्वारा आयोजित जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेच्या कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते.

 

यावेळी जिल्हा समाज कल्याण अधिकारी सुरेश पेंदाम, सहाय्यक लेखाधिकारी राजेंद्र बुर्लावार, समाजकल्याण निरीक्षक मनोज माकोडे, गृहपाल ज्योती शेंडे, राजेश नाईक तसेच समाजकल्याण विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यासह, निवासी शाळा व वस्तीगृहातील विद्यार्थी,विद्यार्थ्यांनी प्रामुख्याने उपस्थित होते.

 

सहाय्यक आयुक्त श्री. यावलीकर म्हणाले, मागील तीन वर्षानंतर विद्यार्थ्यांना त्यांच्या अंगी असलेले कलांगुण व कौशल्य दाखविण्याची संधी या माध्यमातून मिळाली आहे. विद्यार्थ्यांनी पराभवातून जिंकण्याचा आनंद घ्यावा. क्रीडा स्पर्धेमध्ये खेळभावनेतून खेळावे, खेळतांना शिस्तीचे व नियमांचे पालन देखील करावे. खेळ हा जिंकण्यासाठी नाही तर विद्यार्थ्यांमध्ये ऊर्जा निर्माण करण्यासाठी असतो. असेही ते म्हणाले.

 

समाजकल्याण अधिकारी सुरेश पेंदाम म्हणाले, क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धांच्या माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांमध्ये असलेले कलांगुण, कौशल्य व नेतृत्व गुण या मैदानात खेळाच्या माध्यमातून पहावयास मिळणार आहे. विद्यार्थ्यांच्या शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक विकासासाठी खेळ महत्त्वाचा आहे. विद्यार्थ्यांनी खेळतांना खिलाडूवृत्ती अंगीकारावी असे ते म्हणाले.

 

तत्पूर्वी, सहाय्यक आयुक्त अमोल यावलीकर व मान्यवरांच्या हस्ते मशाल पेटवून व तिरंगी फुगे आकाशात सोडून क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. तदनंतर, व्हॉलीबॉल या खेळाने क्रीडा स्पर्धेला सुरुवात झाली.