पिकस्‍पर्धा रब्‍बी हंगाम 2022

पिकस्‍पर्धा रब्‍बी हंगाम 2022

 

गडचिरोली, दि.20: पिकस्पर्धेबाबत यापुर्वीचा दि.05 ऑक्‍टोबर 2022 चा शासन निर्णय अधिक्रमीत करून सन 2022-23 पासुन पिकस्‍पर्धेमध्‍ये आवश्‍यक बदल करुन शासन निर्णय निर्गमीत करण्‍यात आला आहे.रब्‍बी हंगाम 2022 पासून पिकस्‍पर्धा तालुका, जिल्‍हा व राज्‍य पातळीवर राबविण्‍यात येणार आहे.

 

राज्यामध्ये पिकाची उत्पादकता वाढविण्यासाठी विविध भागांमध्ये शेतक-यांकडून विविध प्रयोग करण्यात येतात व उत्पादकतेत वाढ करण्यात येते.अश्‍या प्रयोगशील शेतक-यांना, मिळालेल्या उत्पादकतेबाबत प्रोत्साहन देऊन गौरव केल्यास त्यांची इच्छाशक्‍ती, मनोबल यामध्ये वाढ होऊन आणखी उमेदीने नवनवीन अद्यावत तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल. यामुळे कृषि उत्पादनामध्ये भर घालण्यासाठी शेतक-यांचे योगदान मिळेल. तसेच त्यांचे मार्गदर्शन परीसरातील इतर शेतक-यांना होऊन राज्याच्या एकूण उत्पादनात मोलाची भर पडेल,हा उद्देश ठेऊन राज्यांतर्गत पीकस्पर्धा योजना राबविण्यात येत आहे.

 

पीकस्पर्धेतील पीके : रब्बी पीके- ज्वारी, गहू, हरभरा,करडई व जवस (एकूण 05 पिके) पीकस्पर्धेतील पिकाची निवड करताना त्या पिकाचे तालुक्यातील एकूण लागवड क्षेत्र किमान 1000 हेक्टर असावे. तथापि संबंधित पिकाखालील क्षेत्र 1000 हेक्टर पेक्षा कमी असल्यास व स्पर्धेमध्ये सहभाग घ्यावयाचा असल्यास कृषि संचालक (विस्तार व प्रशिक्षण) यांची विहीत मार्गाने लेखी परवानगी घेणे बंधनकारक आहे.

 

स्पर्धक संख्या, पीकस्पर्धा क्षेत्र, कापणी प्रयोग घ्यावयाची संख्या – पिकस्पर्धेमध्ये सहभागी लाभार्थीचे स्वतःच्या शेतावर त्यापीकाखाली भात पिकासाठी किमान 20 आर व इतर पिकासाठी 40 आर क्षेत्रावर सलग लागवड असणे आवश्यक आहे.

 

स्पर्धेसाठी प्रवेश शुल्क : सर्वसाधारण व आदिवासी गटासाठी पीकनिहाय (प्रत्येक पिकासाठी स्वतंत्र) रक्कम रु.300 राहील.तालुकास्तरावर स्पर्धा आयोजनासाठी सर्वसाधारण गटासाठी किमान 10 व आदिवासी गटासाठी किमान 05 यापेक्षा प्रवेश अर्ज कमी असल्यास, पिकस्पर्धा रद्द करण्यात येऊन प्रवेश शुल्क परत देण्यांत येईल.

 

अर्ज दाखल करण्याची तारीख: रब्‍बी हंगामामध्ये पीक स्पर्धेची अर्ज दाखल करण्याची तारीख खालील प्रमाणे राहिल. ज्वारी,गहू,हरभरा, करडई व जवस – 31 डिसेंबर अर्ज दाखल करण्‍याच्‍या तारखेच्‍या दिवशी शासकीय सुट्टी असल्‍यास, त्‍यापुढील शासकीय सुट्टी नसलेली तारीख गृहीत धरण्‍यात यावी. तालुकास्तर,जिल्हास्तर, व राज्यस्तरावरील पिकस्पर्धा निकाल – प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाचे पिकस्पर्धा विजेते निवडण्यात येतील. या पद्धतीने पिकस्पर्धा घ्यावयाचे हे प्रथम वर्ष असल्याने प्रथम फक्त तालुकास्तरीय व जिल्‍हास्‍तरीय पीकस्पर्धा घेण्यात येईल.

 

राज्‍यपातळीवरील पिकस्‍पर्धा चालुवर्षी होणार नाहीत.मागील वर्षाच्‍या तालुकास्‍तरीय स्‍पर्धेतील पिकनिहाय पहिल्‍या तीन क्रमांकाच्‍या विजेत्‍या शेतक-यांनी जिल्‍हास्‍तरीय पिकस्‍पर्धेमध्‍ये सहभाग घ्‍यावा.

 

बक्षिस स्वरुप

 

 

 

अ.क्र

स्पर्धा पातळी

सर्वसाधारण व आदिवासी गट बक्षिस रुपये

पहिले

दुसरे

तिसरे

1

तालुका पातळी

5,000

3,000

2,000

2

जिल्हा पातळी

10,000

7,000

5,000

3

राज्य पातळी

50,000

40,000

30,000

रब्बी हंगाम – दुय्यम तसेच पौष्टिक तृणधान्य पिकांच्या क्षेत्रात आणि उत्पादनात वाढ होणे आवश्यक आहे, ही बाब विचारात घेऊन पिकस्पर्धेत जास्तीत जास्त शेतक-यांनी सहभागी व्‍हावे. असे आवाहन कृषि आयुक्‍तालयामार्फत करण्‍यात येत आहे.