गुलाबी बोंडअळीच्या नियंत्रणासाठी कपाशीची फरदड घेण्याचा मोह टाळावा

गुलाबी बोंडअळीच्या नियंत्रणासाठी कपाशीची फरदड घेण्याचा मोह टाळावा

गडचिरोली, दि.14:मागील दोन आठवड्यापासून कृषि कीटकशास्त्र विभागाच्या शास्त्रज्ञांनी क्रॉपसॅप प्रकल्पाअंतर्गत परभणी जिल्ह्यातील परभणी, सेलू, मानवत, पाथरी, नांदेड जिल्ह्यातीलनांदेड, लोहा, कंधार, हिंगोली जिल्ह्यातीलवसमत, औंढा, बीड मधील अंबाजोगाई, परळी, केज,जालना जिल्ह्यातील परतूर, मंठा,अंबड,घनसावंगी,जाफ्राबाद,बदनापुर तसेच औरंगाबाद जिल्हयातील औरंगाबाद, पैठण इत्यादी तालुक्यातील प्रक्षेत्र भेटी दिल्या असता गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव 4 ते 5 टक्के च्या दरम्यान दिसून आलाअसून पुढील काळात वाढण्याची शक्यता आहे.
वर्षी चांगला पाऊस झाल्यामुळे मराठवाडयातील बऱ्याच भागात विहिरी,कुपनलिका वकालव्याच्या माध्यमातून सिंचनासाठी पाणी उपलब्ध आहे त्याबरोबरच कापसाला चांगला उठाव असल्यानेशेतकरी कपाशीचे पीक काढण्याऐवजी पाणी व खताच्या मात्रा देऊन कपाशीचा पुर्णबहार (फरदड) घेण्यावरशेतक-यांचा कल दिसून येत आहे.
फरदड कापूस म्हणजे कापसाच्या वेचण्या झाल्यानंतर एखाद पाणी (सिंचन) देऊन पुन्हा कापूस पीक घेतले जाते. फरदड पिकामध्ये जोमदार उत्पादन मिळण्यासाठी पाणी, खते, कीटकनाशके यांचा वापर केला जातो. या पध्दतीमुळे कापूस पीक शेतामध्ये फेब्रुवारी-मार्च महिन्यानंतरही राहते. कपाशी वेचणीनंतर रब्बी पश्चात हंगामामध्ये नवीन पीक घेण्यासाठी जमिनीची मशागत करावी लागते. त्यामुळे मशागत,पेरणी आणि बियाणे अशा बाबींवरील खर्च वाढतो. हा खर्च टाळण्यासाठी खरीप हंगामामध्ये लागवड झालेल्या कापूस पिकापासूनच फरदड कापसाचे वाढीव उत्पादन घेण्याचा शेतकऱ्यांचा प्रयत्न असतो. या कारणामुळे फरदड पीक घेण्याची पध्दत शेतकऱ्यांना फायद्याची वाटते.मात्र,या पध्दतीमुळे शेतीमध्ये दीर्घकाळ पीक राहिल्याने गुलाबी बोंडअळीच्या वाढीसाठी पोषक वातावरण निर्माण होते. गुलाबी बोंडअळीचा जीवनक्रम लक्षात घेता तिचे शाश्वत व्यवस्थापन करण्यासाठी वेळेवर हंगाम संपविणे गरजेचे आहे. म्हणून कोणत्याही परीस्थितीत शेतकऱ्यांनी फरदड घेऊ नये, असे आवाहन करण्यात येत आहे.