खरीप हंगामात पाणीसाठ्यानुसार सिंचनासाठी पुरवठा करण्यात येणार

खरीप हंगामात पाणीसाठ्यानुसार सिंचनासाठी पुरवठा करण्यात येणार

Ø पाणीपट्टी थकबाकी जमा करण्याचे आवाहन

चंद्रपूर, दि. 21 जुलै : आसोलामेंढा प्रकल्प नूतनीकरण विभाग क्र. 2 सावली अंतर्गत आसोलामेंढा प्रकल्पाच्या लाभक्षेत्राला सन-2022 च्या खरीप हंगामातील सिंचनाकरीता पाणीपुरवठा करण्याचे नियोजित केले आहे. त्यानुसार प्रकल्पात उपलब्ध होणाऱ्या पाणीसाठ्यानुसार व आवश्यकतेनुसार खरीप हंगाम सन-2022 या कालावधीत सिंचनासाठी पाणीपुरवठा करण्यात येईल. याबाबत संबंधित क्षेत्रातील लाभधारकांनी नोंद घ्यावी.

खरीप हंगामात पाणी घेण्याकरिता लाभधारक सदस्यांनी त्यांचे पाणी मागणी अर्ज संबंधित शाखा कार्यालयाकडे सादर करावे. तसेच मागील पाणीपट्टी थकबाकी त्वरित संबंधित उपविभागीय कार्यालयाकडे जमा करावी. ज्या लाभधारकांकडे पाणीपट्टी थकबाकी असेल त्यांचे पाणी मागणी अर्ज मंजूर करण्यात येणार नसून सिंचनाकरीता पाणीपुरवठा करण्यात येणार नाही. याची लाभक्षेत्रातील सर्व लाभधारकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन आसोलामेंढा प्रकल्प नूतनीकरण विभाग क्र. 2, सावलीचे कार्यकारी अभियंता यांनी केले आहे.